पुणे -डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व लक्षात घेता सध्या अभियांत्रिकी शिक्षणात नवनवीन अभ्यासक्रमांचा समावेश होत आहे. नव्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. मात्र, या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती मिळत नाही. शासनाकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसल्याने ऐन करोनाच्या संकटात पालकांवर आर्थिक शुल्काचा भार पडत आहे.
तंत्रशिक्षण विभागामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार प्रवेश घेणाऱ्या आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना बहुतांश अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु, इतर मागासवर्ग, भटक्या जमाती या संवर्गातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, रोबोटिक्स, डाटा सायन्स आदी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जात नाही.
आर्टिफिशिअल इंटिलिजन्ससह विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही, ही बाब दोन दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर यासंदर्भात प्रस्ताव अद्याप झालेला नाही. हा प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगत या विषयावर अधिक भाष्य टाळले.
605 अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना फटका