मुंबई – करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असतानाच आज महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारतर्फे याबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून सुधारित निर्बंध जाहीर करण्यात आलेत. या निर्बंधांची अंमलबजावणी 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून होणार आहे. हे नियम 1 मे सकाळी 7 पर्यंत लागू असतील.
काय आहेत नवे निर्बंध?
- मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना.
- सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट.
- सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद.
- खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी.
- सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार.
- इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.
- अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.
- लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा.
- नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार.
- जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी,
- नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड.