पुसेसावळी – पुसेसावळीतील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होईल. त्याबाबत ग्रामस्थांनी चिंता करू नये, अशी घडलेली घटना यापुढे अन्य कोणाबाबत घडू नये, ही आमची जबाबदारी आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पुसेसावळी, ता. खटाव येथील दंगल प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या नूरहसन शिकलगार यांच्या कुटुंबीयांची मंगळवारी भेट घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर देसाई यांनी पोलीस दूरक्षेत्रात ग्रामस्थांसमवेत बैठकही घेतली. पालकमंत्र्यांशी बोलताना शिकलगार कुटुंबीय म्हणाले, ज्याला न्याय मिळाला नाही, तो काय करेल? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला इच्छामरण्याची परवानगी द्या.
त्यावर देसाई म्हणाले, अशी वेळ आम्ही तुमच्यावर येऊ देणार नाही. तुमच्या मुलाबाबत घडलेली घटना दुर्दैवी आणि पूर्णपणे चुकीची आहे. लियाकत शिकलगार म्हणाले, आमची दोन्ही कुटुंबे निराधार झाली आहेत. माझा मुलगा इंजिनियर होता. सरकारी नोकरी न मिळाल्याने, कुटुंबाच्य उदरनिर्वाहासाठी आम्ही त्याला जेसीबी, चार चाकी वाहन घेऊन दिले होते. दोन्ही कुटुंबांची जबाबदारी त्याच्यावर होती. या वाहनांचे कर्ज आता आमच्या डोक्यावर आहे. कुटुंबाला सांभाळण्याची वेळ वयस्कर माणसांवर आली आहे. त्यावर, तुमच्या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी आमची आहे. कोणतीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा.
प्रशासन तुमच्या पाठीशी राहील, असे देसाई यांनी सांगितले. भविष्यात काही घटना घडेल, असे प्रशासनास सूचित करूनही कार्यवाही झाली नाही. वेळीच लक्ष दिले गेले असते, तर ही घटना घडली नसती, असेही शिकलगार म्हणाले. त्यावर, कोणीही भीतीखाली वावरू नये. कोणाबद्दल संशय किंवा तक्रार असल्यास अधिकाऱ्यांना सांगावे. प्रशासनाकडून मुद्दाम कोणालाही त्रास होणार नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलीस दूरक्षेत्रात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी म्हणणे मांडले. या घटनेत सहभागी असलेली मुले बिनधास्त फिरत असून, राजकीय हस्तक्षेपाने काही जणांवर कारवाई केली जात आहे.
भीतीपोटी अनेक मुले गाव सोडून गेली आहेत. आमची मुले खरोखरच दोषी असतील, तर आम्ही स्वतःहून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ. आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या दोन युवकांना कठोर शासन झाले पाहिजे. निर्दोष नूरहसनचा हकनाक बळी गेला. सर्व समाजात मिसळणाऱ्या या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग वेदनादायी आहे, असे महिलांनी सांगितले. दंगलीत सहभागी असलेल्यांविरोधात ठोस पुरावे पोलिसांकडे द्यावेत. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले असून. निरपराधांवर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही देसाई यांनी दिली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, पुसेसावळीत शांतता प्रस्थापित झाली आहे.
सलोखा राखण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला गावाने प्रतिसाद दिला आहे. या घटनेच्या तपासावर पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, लोकांनी पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरू ठेवावेत. या घटनेनंतर अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.