बारामती – ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेले इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून युवा शास्त्रज्ञ तयार होतील व संशोधनाच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल. कारण कल्पनांना पंख फुटण्याचे तरुणांचे वय असते.
अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्थांच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
बारामतीतील ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. अप्पासाहेब पवार इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (मंगळवारी) झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उद्योगपती बाबा कल्याणी, विजय शिर्के, दीपक छाब्रिया, अतुल किर्लोस्कर, प्रतापराव पवार, आमदार रोहित पवार, राजू बारवाले,
जगन्नाथ शिंदे, आर. वेंकटरमणन, डॉ. संतोष भोसले, मायकेल इरकल, सीईओ नीलेश नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात 50 वर्षांचा आढावा घेत काही अडचणी नमूद केल्या.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार कुटुंबीयांनी विकासाचा ध्यास घेतला असून बारामतीचे परिवर्तन घडविले आहे. युवकांना स्वावलंबी होण्यासाठी ही संस्था मार्गदर्शक ठरेल.
परदेशात जाऊन तेथील चांगल्या बाबी इकडे आणल्या जाणे महत्त्वाचे असते. आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रात देशात अग्रेसर आहेच; पण राज्याला जगातही सर्वोत्तम स्थानावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राज्याच्या प्रगतीच्या आड येणारे सर्व अडथळे दूर करू.
डॉ. अप्पासाहेब पवार यांचे नाव
शरद पवार यांनी आगामी काळात बारामतीत इंटेलिजेंट सेंटर उभारण्याचा मनोदय बोलून दाखविला. पवार म्हणाले, आज उद्घाटन झालेल्या केंद्राला डॉ. आप्पासाहेब पवार यांचे नाव दिले आहे. आप्पासाहेबांनी संस्थेमध्ये नाविन्य कसे येईल, संस्थेत उत्तम संशोधन कसे करता येईल यासाठी स्वतःला झोकून देऊन कार्य केले होते. त्यामुळे त्यांचे नाव या केंद्रासाठी अत्यंत समर्पक आहे.
शालेय विद्यार्थी आणि युवकांमध्ये ज्ञान, विज्ञानाची आवड निर्माण्या करण्यासाठी आणि त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. शेतीमध्ये सुधारणा होऊन गरीबांच्या घरी क्रांती व्हावी, यासाठी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने सुरुवातीपासूनच काम केले. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरिबातील गरीब घरातील मुलांना शिक्षण घेता येत आहे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री