पुणे -रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या भविष्याची गरज ओळखून त्यांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत “फिरते पथक’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या प्रकल्पाला नाविण्यपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने पुणे, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर या सहा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी निधी प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाचा खर्च बाल न्याय निधीमधून करावा लागणार आहे.
या प्रकल्पात समाविष्ठ असलेल्या प्रत्येक जिल्ह्याला एक बाल स्नेही बस आणि व्हॅन उपलब्ध देण्यात येईल. जिल्हा व महिला व बाल विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातल्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने प्रकल्प राबवावा लागेल. प्रत्येक बस, व्हॅनसाठी एक समुपदेशक, एक शिक्षिका किंवा शिक्षक, एक वाहन चालक व एक काळजी वाहक अशा एकूण 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. बस, व्हॅनची वेळ सकाळी 9 ते सांयकाळी 6 अशी असणार आहे. रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणीच बस, व्हॅन फिरणार आहेत.
मार्गदर्शक सूचना जारी
बालकांना खेळ, शैक्षणिक साहित्य, गाणी, चित्रकला, नृत्य, गोष्टी याद्वारे अभ्यासाची गोडी लावावी व कालांतराने पालकांनी त्यांच्या बालकाला नियमित अंगणवाडी, शाळेत पाठविण्यासाठी प्रोत्साहित करावे लागणार आहे. प्रकल्पाबाबतच्या मार्गदर्शक सूचना महिला व बालविकास विभागाच्या सहसचिव शरद अहिरे यांनी जारी केलेल्या आहेत.