पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ऐन कांदा लागवडीच्या काळात नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपाच्या विद्युत मोटारीच्या केबलमधील तारा चोरीला जाण्याचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून केबल चोरट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (दि. 20) रात्रीच्या वेळी घोडनदी काठी असलेल्या विद्युत पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यानी लंपास केल्या आहेत. शेतकरी कुंडलिक टाव्हरे, नवनाथ टाव्हरे, कांताराम टाव्हरे, महेंद्र भोर, संजय टाव्हरे,सावळेराम शेळके या सर्व शेतकऱ्यांच्या अंदाजे 40 हजार रुपये किमतीच्या केबली चोरीला गेल्या आहेत.
या सर्व शेतकऱ्यांनी पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास पारगाव पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करीत आहेत. तापमानात वाढ झाल्याने शेतातील पिकांना दर 3 ते 4 दिवसांनी पाणी देणे गरजेचे असते.
अनेक गावांमध्ये सध्या कांदा लागवड सुरू आहे. कृषीपंप नदीकाठी असल्याने चोरट्यांनी केबलमधील विद्युत तारा काढून नेण्याचे प्रमाण वाढले आहे, यामुळे शेतातील कांदा लावगड कशी करावी आणि पिकांना पाणी कसे द्यावे ही चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.
आंबेगाव तालुक्यात गेल्या वर्षभरात लाखो रुपये किमतीच्या विद्युत पंपाच्या केबली रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. भरमसाठ लाईट बील शेतातील मालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यामध्येच विद्युत केबली चोरीला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.