शिरवळ – केसुर्डी, ता. खंडाळा येथील एमआयडीसीच्या रस्त्यावर प्रकलग्रस्तांनी सोमवारी रास्ता रोको केल्याने एमआयडीसीत जाणाऱ्या कामगारांची तारांबळ उडाली. एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मार्च 2008 मध्ये ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना देय असलेल्या 15 टक्के भूखंड परताव्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही. जमीन अधिग्रहित करताना एमआयडीसी व शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष आहे.
या कारणांसाठी दि. 26 जुलै 2016 व दि. 17 जानेवारी 2018 रोजी आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळीही लेखी आश्वासने देण्यात आली तरी प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, सचिव डॉ. विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीत सकाळी सहाच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासमवेत सायंकाळी 5 वाजता बैठक घेण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे एमआयडीसीत जाणाऱ्या कामगारांची तारांबळ उडाली. शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या सहकार्याने प्रकल्पग्रस्त व एमआयडीसीचे कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण यांची बैठक होऊन अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले.