मुंबई – अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील विविध देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळणे चालूच आहे. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजार निर्देशांकांत दीड टक्क्यांची घट नोंद केली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 843 अंकांनी कोसळून 57,147 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 257 अंकांनी म्हणजे 1.49 टक्क्यांनी कोसळून 16,983 अंकावर बंद झाला.
इंडसइंड बॅंक, नेस्ले, टाटा स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, डॉक्टर रेड्डीज, टायटन, रिलायन्स या कंपन्यांनी कालच्याप्रमाणे आजही सपाटून मार खाल्ला. मात्र ऍक्सिस बॅंक आणि एशियन पेंट्सच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली. जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर म्हणाले की, गुंतवणूकदारांना जोखीम नको असल्याचे दिसत आहे. टीसीएस कंपनीने चांगला ताळेबंद जाहीर करूनही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता लवकरच भारतातील महागाईच्या आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे दिसून येते.
मात्र परदेशातील शेअर बाजाराचे निर्देशांक ज्या प्रमाणात कोसळत आहेत त्या प्रमाणात भारतातील शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत नाहीत. परदेशी गुंतवणूक परत चालली जात असली तरी देशातील संस्थागत गुंतवणूकदार ती जागा भरून काढीत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे नुकसान तुलनेने कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2,139 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. भारतीय कंपन्यांचे ताळेबंद आता जाहीर होत आहेत. त्यामुळे त्या आधारावर गुंतवणूकदार आगामी काळामध्ये खरेदी-विक्रीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये रशिया – युक्रेन युद्ध अधिक चिघळले तर एकूणच परिस्थिती नकारात्मक होऊ शकते. आज मिडकॅप, स्मॉल कॅप, दूरसंचार, रिऍल्टी, माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.
…….