मुंबई – सुट्या भागाच्या टंचाईचा प्रश्न बराच संपुष्टात आला आहे. त्यामुळे कंपन्यानी उत्पादन वाढविले आहे. ग्राहकांना पाहिजे ती वाहने आता मिळू लागली आहेत. त्यामुळे नवरात्रीवेळी कार विक्रीत भक्कम वाढ झाली. वितरक व कार कंपन्या दिवाळीत आणखी विक्री वाढण्याची आशा करीत आहेत.
बऱ्याच वाहनांचा वेटिंग पिरियड आता कमी झाला आहे. त्याचबरोबर करोनाच्या काळात ग्राहकांना इच्छा असूनही वाहने खरेदी करता येत नव्हती. आता परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे ग्राहक खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. गेल्या वर्षाच्या नवरात्री वेळी झालेल्या विक्रीच्या तुलनेत यावर्षी झालेली कार विक्री 57% नी जास्त आहे. वितरकांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे की, दुचाकी वाहनांची विक्री 52 टक्क्यांनी वाढली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री 115 टक्क्यांनी वाढली आहे. व्यावसायिक वाहनांची विक्री 48 टक्क्यांनी वाढले आहे. प्रवासी वाहनांची विक्री 70 टक्क्यांनी वाढली तर ट्रॅक्टरची विक्री तब्बल 58% नी वाढली आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने म्हटले आहे की, नवरात्री वेळी 1 लाख 75 हजार कार विकल्या गेल्या. गेल्या वर्षी मात्र ही संख्या केवळ 81,000 इतकी होती. ह्युंदाई या कार कंपनीने नवरात्रीच्या दहा दिवसांत 30 हजार वाहने विकली. वाहनांचा वेटिंग पिरियड कमी होत असला तरी आगामी काळात तो आणखी कमी करण्यासाठी आम्ही कारचे उत्पादन वेगात वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.
टाटा मोटर्सची विक्री तब्बल 47,506 युनिट इतके झाले आहे. महिंद्रा कंपनीने नवी वाहने उपलब्ध केली असून या कंपनीच्या विक्रीत वाढ होत आहे. त्याचबरोबर कंपनीकडे 2.6 लाख ग्राहकांनी नोंदणी केलेली आहे. दिवाळीमध्ये विक्रीत आणखी वाढवण्याची शक्यता आहे. विशेषतः दुचाकी विक्रीबाबत आम्ही जास्त आशावादी आहोत असे या संघटनेने म्हटले आहे.
……..