मुंबई – वाढणारी महागाई, जनतेची कमी झालेली क्रयशक्तीे त्याचबरोबर जागतिक पातळीवर निर्माण झालेली अनिश्चितता या कारणामुळे शेअर बाजार निर्देशांक गेल्या काही दिवसापासून अस्थिर आहेत. एकूण परिस्थितीचा विचार केला तर शेअर बाजार निर्देशांकांत आठ ते दहा टक्के करेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अँम्बीट कॅपिटल या संस्थेचे संस्थागत शेअर विभागल प्रमुख धीरज अगरवाल यांनी सूचित केले.
ऑक्टोबर महिन्यात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर गेले होते. त्यानंतर विविध कारणांमुळे निर्देशांकात आतापर्यंत आठ टक्के घट झाली आहे. युरोपात निर्माण झालेला तणाव, अमेरिका आणि एकूणच सर्व देशांमध्ये वाढत असलेली महागाई, वाढत असलेले क्रुडचे दर आणि शक्य अमेरिकन व्याजदर वाढ या कारणांमुळे निर्देशांकात ही घट झाली आहे. अशा परिस्थिती मध्ये पुन्हा आठ ते दहा टक्के करेक्शन झाले तर ती फार मोठी नकारात्मक घटना नसेल तर शेअरचे योग्य मूल्यांकन होईल असे आपल्याला वाटते असे अगरवाल यांनी सांगितले.
भारतीय जीवन विमा महामंडळाच्या आयपीओमधील शेअरची खरेदी करण्यासाठी सध्या शेअर बाजारात विक्री चालू आहे. या शक्यतेचा त्यांनी इन्कार केला. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचे ठरविले असल्यामुळे शेअर बाजारात खरेदी वाढत जाईल असे बोलले जाते. मात्र अगरवाल यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांमध्ये जो खर्च केला जाणार आहे त्यामध्ये 60 टक्के खर्च राज्यांकडून होणे अपेक्षित आहे. मात्र राज्याचे आर्थिक गणित सध्या बिघडलेले आहे. त्यामुळे हा खर्च खरेच होईल की नाही याबाबत शंका आहेत. बऱ्याच विश्लेषकानी भांडवली गुंतवणूक वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वाढतील असे म्हटले आहे. मात्र 2003 ते 07 या काळात निर्देशांक जसे वाढले तसे या वेळी वाढणार नाहीत असे अगरवाल यांना वाटते.
अमेरिकेतील व्याज दरवाढीच्या शक्यतेमुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक आतापर्यंत 5 ते 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. मात्र अजूनही या कंपन्यांचे शेअर नव्या गुंतवणूकदारांसाठी नफादायक नसल्याचे बोलले जात आहे, या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.