मुंबई – शेअर बाजार निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत. तर काही खरेदी करीत आहेत. या परिस्थितीमध्ये कालच्या प्रमाणे आजही शेअर बाजाराच्या निर्देशांकात फारशी वाढ किंवा घट झाली नाही.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ चार अंकांनी वाढून 55,949 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दोन अंकांनी वाढून 16,636 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा, ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरची बऱ्यापैकी खरेदी झाली. मात्र भारती एअरटेल, मारुती, स्टेट बॅंक, पावर ग्रीड, टाटा स्टील या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
दक्षिण कोरियाच्या रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर दक्षिण आशियातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. विकसित देशातील दक्षिण कोरिया या पहिल्या देशाने व्याजदरात वाढ केली आहे. लवकरच विकासदराची आकडेवारी जाहीर होणार आहे. ही आकडेवारी सकारात्मक असल्याची लक्षणे दिसून येत आहेत.
मात्र मुडीज या पतमानांकन संस्थेने करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेअर बाजारातील वातावरण नरम गरम होते. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच आहे. काल या गुंतवणूकदारांनी 1071 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याचे आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली.
छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप 0.33 टक्क्यापर्यंत वाढले. ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, भांडवली वस्तू, ग्राहक वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक वाढले तर दूरसंचार,धातू या क्षेत्राच्या निर्देशांकांना फटका बसला