मुंबई – नकारात्मक जागतीक संकेतामुळे शेअर बाजारात सकाळपासून बरीच विक्री झाली. मात्र बाजार बंद होतांना खरेदी वाढून निर्देशांक कालच्या तुलनेत वरच्या पातळीवर बंद झाले. जागतीक पातळीवर सध्या सुट्याचा काळ चालू आहे. त्यामुळे विविध देशातील निर्देशांकाना कसलीच गती नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर बाजारातील हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
बाजार बंद होताना शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 223 अंकांनी वाढून 61,133 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 68 अंकांनी वाढून 18,191 अंकावर बंद झाला. भारतीय स्टेट बॅंक, टाटा स्टील, इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, सन फार्मा, आयसीआयसीआय बॅंकेने आजच्या तेजीचे नेतृत्व केले. तर टाटा मोटर्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिन्सर्व्ह, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सेन्सेक्स संदर्भातील 19 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर 11 कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले. बाजारातील कामकाजासंदर्भात कोटक सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले की, सध्या सुट्यामुळे जागतिक वाजावात बाजारात वातावरण मंद आहे. त्याचबरोबर नवीन वर्षात महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंका व्याजदरात वाढ कायम ठेवणार आहेत. त्यामुळे बाजारता अस्थिरता आहे.
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता अधिक आहे. मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप 0.22 टक्क्यांनी तर मिड कॅप 0.09 टक्क्यांनी वाढला. नैसर्गिक वायू, धातू, ऊर्जा, बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक वाढले. तर भांडवली वस्तू आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर होते परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी 872 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.