कोलकत्ता – पोलाद उत्पादकांनी गेल्या काही दिवसात पोलादाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. या दरवाढीचे पोलादाच्या उत्पादकांनी समर्थन केले आहे. त्याचबरोबर दर आटोक्यात आणण्यासाठी पोलादाच्या खनिजाची निर्यात बंद करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.
पोलाद उत्पादकानी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पोलादाच्या किमती जर जास्त पातळीवर राहिल्या तर त्याचा पायाभूत सुविधा निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. आम्हाला कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे पोलादाच्या दरात वाढ करावी लागत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. खनिजाच्या किमती वाढल्या असतानाच जागतिक पोलाद उत्पादन कमी झाल्यामुळे पोलादाची आयात महागात पडत आहेत.
त्यामुळे देशात पोलादाच्या किमती वाढल्या असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. पोलादाच्या खनिजावर किमान सहा महिने तरी निर्यात बंदी घालण्याची गरज आहे. आगामी काळातील परिस्थिती पाहून या निर्णयावर फेरविचार केला जाऊ शकेल.
जागतिक बाजारात पोलादाचे दर दुप्पटीने वाढल्यामुळे भारतीय बाजारपेठेत पोलादाचे दर वाढत आहेत. पोलाद उत्पादकाच्या संघटनेचे महासंचालक भास्कर चटर्जी यांनी सांगितले की, खनिजाच्या किमती 1,960 रुपये प्रति टनावरून 4,160 रुपये प्रति टन झाल्या आहेत.
खनिजाचे दर एक हजार रुपयांनी वाढल्यानंतर पोलादाच्या किमती दोन हजार रुपयांनी वाढतात. पोलाद उत्पादकांनी साखळी करून पोलादाच्या किमती वाढविल्या आहेत, असा आरोप क्रेडाई या विकसकांच्या संघटनेसह अनेकांनी केला आहे. स्पर्धा आयोगाकडून या दरवाढीच्या चौकशीची मागणी केली आहे. क्रेडाईने ही दरवाढ आवश्यकतेपेक्षा जास्त करण्यात आली असल्याचे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहे.