बेलसर, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यामध्ये अलीकडील काळामध्ये पुरंदरच्या ग्रामीण भागात चोरांनी थैमान मांडले आहे. बेलसर, साकुर्डे, शिवरी, निळुंज, पिसर्वे, तक्रारवाडी, खेंगरेवाडी, पिलानवाडी, जवळार्जुन, कोथळे सोबतच इतर गावांमध्ये चोर्या करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कपडे, रोख रक्कम, सोने, गाड्या यांची चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. चोरांच्या भीतीने अलीकडे सर्व गावातील तरुण आणि नागरिक रात्रभर जागे राहत आहेत.
पुरंदर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. तर दिवसभर ऊन आणि संध्याकाळी थंडी असे वातावरण असल्यामुळे पहाटेच्या सुमारास साखर झोपेत असताना चोर चोरीच्या प्रयत्नाने गावांमध्ये शिरून चोरी करीत आहेत. तर तालुक्यामध्ये सध्या चोरांचा मोठा सुळसुळाट असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
शेती पंपाची वीज ही काही दिवस रात्रीची असल्याने बरेच शेतकरी शेतीला रात्रीचे पाणी देतात. तर बाहेरगावी कामाला गेलेल्या लोकांना वेळी अवेळी रात्री घरी परत यावे लागते. अशातच या चोरांचा मोठा सुळसुळाट असल्याने नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील साकुर्डे गावामध्ये बाहेरील फिरस्ती व्यावसायिकांना बंदी घालण्यात आली आहे.त्यामध्ये फेरीवाले, भंगारवाले, फळ विक्रेते व इतर फेरीवाले विक्रेत्यांना साकुर्डे गाव व वाड्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी कोणीही जबरदस्तीने फिरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल व गावांमध्ये परिसरामध्ये अनोळखी व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यासंबंधी चौकशी करावी, असे फलक साकुर्डे गावातील चौका चौकात लावण्यात आले आहेत.
अनेक ठिकाणी अफवांचा पाऊसही
काही गावांमध्ये सध्या ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहेत. तर यंत्रणेकडून गावांमध्ये रात्रीच्या गस्ती घालणे सुरू आहे. तर अनेक ठिकाणी सध्या अफवांचा पाऊसही पडताना दिसत आहे काही ठिकाणी चोर आले, अशी चर्चा होते; परंतु अधिक माहिती घेतल्यानंतर ती अफवा असल्याचे समजते त्यामुळे अफवांना बळी पडू नये, असे आवाहन ग्रामसुरक्षा दलांकडून करण्यात येत आहे.