लोणी काळभोर, (वार्ताहर)- शेतक-यांचे हित पहाण्याऐवजी व्यापा-यांच्या हिताला महत्त्व देणारी मंडळी समोरच्या पॅनलमधून यशवंतच्या निवडणूक रिंगणात उतरली आहेत. गेल्या १० महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कुठलेही प्रभावी काम न करता, बाजार समितीमध्ये होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करून यांनी कायम शेतकरी विरोधी धोरण अवलंबले आहे.
आता हीच मंडळी शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून आम्ही कारखाना सुरू करू शकतो अशा वल्गना करीत आहेत. मुळात ही शेतकरी विकास आघाडी नसून व्यापारी विकास आघाडी आहे असा घणाघात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी केला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोरतापवाडी येथे कोपरा सभेत शेतकरी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख माधव काळभोर, दिलीप काळभोर, सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर, महादेव कांचन, सुभाष काळभोर, विलास काळभोर, सोपान कांचन, राजेंद्र टिळेकर, तुकाराम पवार, राजेंद्र खांदवे, रघुनाथ चौधरी, प्रवीण कामठे, बाबासाहेब काकडे, मारुती कुंजीर व उमेदवार उपस्थित होते.
चौधरी म्हणाले की, यशवंत कारखाना चालू करू शकतील, अशी सक्षम मंडळी रयत सहकार पॅनलमध्ये आहेत. ज्येष्ठ नेते माधव काळभोर, सभापती दिलीप काळभोर, सुरेश घुले, महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर, रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वातील रयत सहकार पॅनलबरोबर आम्ही भक्कमपणे उभे आहोत. राजीव घुले पाटील यांचे स्वतःचे दोन कारखाने आहेत. आज रयत पॅनलचे माध्यमातून उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. त्यांच्या अनुभवाचा यशवंत चालू करण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
यशवंत चालू करण्यासाठी राज्य सरकारची मदत लागणार आहे. सर्वपक्षीय अशा रयत सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. भाजपचे रोहिदास उंद्रे, संदीप भोंडवे, रवींद्र कंद, तालुकाध्यक्ष श्यामराव गावडे,
अजिंक्य कांचन, नवनाथ काकडे, कमलेश काळभोर अशी सर्व मंडळी रयत सहकार पॅनलसोबत आहोत. आमचे नेते दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्यामार्फत भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कारखाना सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत.
सध्या पुणे बाजार समितीकडे १७० कोटी रुपये ठेव भाग भांडवल शिल्लक आहे. पुण्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथे अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. त्यातच बाजार समिती जर शहरात राहिली तर तिचे राष्ट्रीयीकरण होण्याची दाट शक्यता आहे.
भविष्यात पुण्याचा मुख्य बाजार जर थेऊर येथील जागेत हलवला तर शेतकऱ्यांच्या दोन्ही संस्था एकाच ठिकाणी होतील व बाजार समितीच्या माध्यमातून कारखाना उभा करण्यासाठी आर्थिक मदत करता येईल, असा प्रस्ताव रयत सहकार पॅनलच्या नेते मंडळींना आम्ही दिला आहे. तालुक्याच्या दोन्ही शेतकरी संस्था एकाच ठिकाणी आल्याने शेतकऱ्यांची सोय होईल.
सामर्थ्यवान रयत सहकारला साथ द्या
सुदर्शन चौधरी म्हणाले की, माझे आजोबा (स्व) भाई के. डी. चौधरी कारखान्याचे संचालक व उपाध्यक्ष होते. त्याचबरोबर माझे वडील जयप्रकाश चौधरी व चुलते अरविंद चौधरी हे संचालक होते. मी स्वतः सभासद असून यशवंत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अथक प्रयत्न घेतले. व्यापारी विकास आघाडीच्या नेतेमंडळींना जनता त्यांची जागा दाखवणार हे नक्की.
मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी सभासदांना कळकळीची विनंती करतो की, यशवंत सुरु करू शकतील, अशा सामर्थ्यवान रयत सहकार पॅनलला किटली या चिन्हसमोर शिक्का मारून प्रचंड बहुमतेने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.