राज्यात 511 केंद्रे; साडेआठ लाख लाभार्थी
पुणे – केंद्राने “सिरम इन्स्टिट्यूट’ला लसींची ऑर्डर दिली असली तरी त्यातील महाराष्ट्रासाठी किती लस मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. राज्याच्या आरोग्य विभागाला केंद्राकडून अद्याप किती लस मिळणार, “सिरम’ ची किती आणि “भारत बायोटेक’ची किती याची माहिती अद्याप मिळाली नाही, परंतु राज्याने 511 केंद्रांवर लस देण्याची तयारी केल्याची माहिती, राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक आणि राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सोमवारी दिली.
येत्या 16 जानेवारीपासून संपूर्ण देशात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. महाराष्ट्रात सुमारे साडेआठ लाख लाभार्थ्यांनी “कोविन ऍप’ वर लसीसाठी नोंदणी केली आहे.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यातील सर्व जिल्हे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे मिळून 511 केंद्र तयार करण्यात आले आहेत. लाभार्थी जरी साडेआठ लाखांच्या आसपास असले तरी राज्याला अद्याप किती लस मिळणार याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाला सोमवारी रात्री उशीरापर्यंत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात किती संख्येत लस मिळणार हे समजले की, त्यावर कोठे किती लस पोहोचवायची याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
लस वायुवेगाने पोहोचवणार
राज्याचा लसीचा कोटा हातात मिळाल्यानंतर तो वायुवेगाने नियोजित ठिकाणी पोहोचवणार असा विश्वास,राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक आणि राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी व्यक्त केला. लस पोहोचवण्याची आमची तयारी पूर्ण आहे, वाहने, दळणवळण व्यवस्थाही तयार आहे. 16 तारखेच्या आत आम्ही लस इच्छितस्थळी पोहोचवणार असेही डॉ. पाटील म्हणाले.