सातारा – शाळा व महाविद्यालये ऑगस्टमध्ये सुरू करण्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. दुसरीकडेशिक्षण विभागाने नवीन वर्षाच्या कामकाजासाठी शिक्षकांना सूचना दिल्या आहेत. मात्र, राज्यातील शाळांमधील 45 हजार शिक्षकेतर पदे रिक्त असून ती प्रथमतः भरावीत व मग शाळा सुरु कराव्यात, अन्यथा या शाळांवर हजर न राहण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा व शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने व सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिला आहे.
राज्य संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर व उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. शासन नियुक्तीने समितीच्या शिफारशीनुसार शिपाई, लिपिक, ग्रंथपाल व सहायक अनुकंपाधारकांची तात्काळ भरती करावी. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या यापूर्वीच्या पदोन्नतीला तात्काळ मान्यता द्यावी, माध्यमिक शाळातील कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीच्या केलेल्या शिफारशीनुसार 10, 20 व 30 वर्षानंतरचा लाभ पात्र कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करावा.
माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 24 वर्षांच्या लाभाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अमंलबजावणी तात्काळ करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी राज्य शिक्षकेतर महामंडळ सातारा जिल्हा कार्यवाह रमेश इंगवले, चंद्रशेखर सावंत, प्रणाली गायकवाड, विद्याधर पाटील तसेच सातारा, सांगली, रायगड, पुणे जिह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.