सातारा -सैनिकी परंपरा लाभलेल्या सातारच्या भूमीत लष्कर, सैन्य भरती केंद्र सुरु करावे, आजी- माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किंवा कमांड हॉस्पिटलच्या अखत्यारितील वैद्यकीय उपकेंद्र तातडीने सुरु करावे, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रश्नांबाबत निर्णय घेण्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली.
उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहर आणि जिल्हयाला अद्वितीय सैनिक परंपरा लाभली आहे. मिलिटरी अपशिंगे सारख्या गावांमधील प्रत्येक घरटी किमान एक व्यक्ती ब्रिटीश आमदनीपासून ते आजपर्यंत सैन्यात जाऊन देशसेवा बजावत आहे. या भूमीतील लढवय्या परंपरेमुळे जिल्ह्यातील हजारो युवक सैन्य भरतीसाठी आसुसलेले असतात. परंतु, काही मर्यादा, तांत्रिकतेच्या कारणांमुळे अनेकांची भरती होण्याची संधी हुकत असते.
त्यामुळे सातारा येथे सैन्य भरती केंद्र असावे. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. सध्या नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, अहमदाबाद, जामनगर या ठिकाणी सैन्य भरती केंद्रे आहेत.
जिल्ह्यातील तरुणांना पुणे किंवा औरंगाबाद, मंबई येथे भरतीसाठी जावे लागते. आजी माजी सैनिकांच्या जिल्ह्यात सैन्य भरती केंद्र आवश्यक आहे.
त्यामुळेसातारा येथे सैन्य भरती केंद्र सुरु करण्यात यावे, अशी युवकहिताची मागणी रास्त असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजनाथसिंह यांना स्पष्ट केले. तसेच आजी- माजी सैनिकांच्या जिल्ह्यातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकरीता वैद्यकीय सहाय्याकरीता सातारा येथे सैन्य हॉस्पिटल उभारणे अत्यंत गरजेचे आहे.
देशासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या आजी- माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्मी हॉस्पिटलची उभारणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. किमान कमांड हॉस्पिटलचे उपकेंद्र सातारा येथे तातडीने सुरु करण्याबाबत सूचना जारी कराव्यात, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.