पुणे -जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य पदाच्या रिक्त जागेवरून सभागृहात सोमवारीही गोंधळ होणार अशी शक्यता होती. दोन्ही उमेदवारांना माघार घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ देऊनही कोणीच माघार घेतली नाही. त्यामुळे “निवडणूक प्रक्रिया सुरू करायची का’ असे निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारताच सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज अध्यक्षांना दिला. त्यानंतर दत्तात्रय झुरूंगे यांनीही उमेदवारी माघारीचा अर्ज दिला. या 1 तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा स्थायी समिती सदस्य पद “रिक्तच’ राहिले.
22 ऑगस्टची तहकुब सभा सोमवारी घेण्यात आली. यावेळी स्थायी समितीच्या रिक्त पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी दोघांचेही अर्ज वैध असल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेची परंपरा अबाधित राहावी यासाठी दोघांपैकी एकाने माघार घ्यावी, कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी तोडगा काढावा असे आवाहन अध्यक्ष विश्वास देवकाते आणि सभागृहातील सदस्यांनी केले. त्यासाठी दोन्ही उमेदवारांना 15 मिनटांचा वेळ देण्यात आला. यावेळी झुरंगे यांनी माघार घ्यावी आणि निसर्ग नियमानुसार अंकिता पाटील यांना संधी द्यावी, अशी चर्चा सभागृहात सुरू झाली. यावेळी अनेक सदस्यांनी झुरंगे यांची मनवळवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही.
झुरंगे यांनी सभागृहात येत “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य झालो. माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मी उमेदवारी अर्ज भरला, त्यामुळे सभागृह जो निर्णय देईल तो मला मान्य असेल’. अखेर निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तेवढ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी उमेदवारी माघारीचा अर्ज अध्यक्षांना दिला. “मला माझ्या समाजकारणाची सुरवात अशापद्धतीच्या राजकीय घडामोडीतून करायची नाही. ही जागा माझ्या आजीची आहे. मला सभागृहात तरुणांचे, विशेषत: मुलींचे आणि महिलांचे प्रश्न मांडायचे आहे. त्यामुळे मी अर्ज मागे घेते, असे स्पष्ट केले. त्यानंतर लागलीच झुरंगे यांनीही निडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र दिले. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे तसेच निवडणूक लढविण्यास एन वेळेला दोघांनीही नकार दिल्याने विश्वासराव देवकाते यांनी निवडणूक तहकूब करत असल्याचे सांगत, आचार संहिता झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सांगितले. यामुळे स्थायी समितीची जागा पुन्हा राजकीय नाट्यमुळे रिक्त राहिली.
कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
स्थायी समितीच्या रिक्तपदासाठी कॉंग्रेसच्याच दोन सदस्यांनी उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे कॉंग्रेसमधील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. परंतु, सोमवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेवेळी पक्षातील अंतर्गत वाद किती टोकाला पोहोचला हे दिसून आले. कारण, दोन्ही उमेदवार अर्ज माघे घेत नव्हते, त्यामुळे मतदान होणार हे निश्चित झाले होते. “ही जागा नियमाने अंकिताला मिळाली पाहिजे’ अशी मानसिकता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची होती. तर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाने झुरुंगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न येत नसल्याचे सांगितले.