अर्षद आ. शेख
श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरापासून केवळ सात किलोमीटर दूर असणाऱ्या भिंगाण या आदिवासी बहुल गावात स्वातंत्र्यानंतर काल पहिल्यांदा एसटीचे आगमन झाले. वर्षानुवर्षे यासाठी खटाटोप करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
श्रीगोंद्यापासून दक्षिणेला हाकेच्या अंतरावरील हे छोटे गाव मूलभूत सोयीपासून वंचित आहे.लोकसंख्या विरळ. शिवाय त्यात आदिवासी भिल्ल समाजाची संख्या सर्वाधिक. तेथील नागरी प्रश्नांबाबत सरकारची भूमिका कायम उदासीन. नाना शिंदे या तरूणाने सतत आवाज उठवत गावातील अनेक समस्या मार्गी लावल्या. श्रीगोंदा ते भिंगाण रस्ता हा फक्त नावालाच होता. दुतर्फा वाढलेल्या बाभळी, जागोजागी पसरलेली खडी, लहान- मोठे असंख्य खड्डे, पावसाळ्यात खचणारी वाहने यामुळे या मार्गावरील वाहतूक कायम ठप्प होत असे. रस्ता नसल्याचे कारण पुढे करीत आजवर या गावाला कधीही एसटीचे दर्शन झाले नाही. अखेर रस्ता होण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले. प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून या गावाला नुकताच रस्ता झाला. पक्की सडक झाल्यानंतर नाना शिंदे व त्यांचे सहकारी श्रीगोंदा आगारकडे एसटी चालू करण्यासाठी पाठपुरावा करीत होते.
सोमवारी सकाळी श्रीगोंदा ते भिंगाण या एसटीचा मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला. त्यासाठी कार्यक्रम श्रीगोंदा येथे झाला. त्यावेळी बाबासाहेब भोस, जिल्हा परिषद सदस्या पंचशीला रमेश गिरमकर, भिंगाणचे आजी, माजी सरपंच, तसेच तुकाराम चव्हाण, नानासाहेब कोथिंबीरे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, सतीश नवले, लखन शिंदे, दत्ता खंडागळे, विलास रसाळ, नाना शिंदे व आगारप्रमुखासह अनेक जण उपस्थित होते.एसटीची सजावट करण्यात आली होती. हिरवा झेंडा दाखवून भिंगाणच्या दिशेने एसटी धावली.अन एसटीच्या 54 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भिंगाण गावाला एसटीचे ‘पाय’ लागले.
एसटी पाहताच त्यांच्या आनंदाला आले उधाण
सात किलो मीटरचे अंतर दहा – बारा मिनिटांत पूर्ण करीत एसटी भिंगाण येथे पोचली. तिला पाहताच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ढोलताशांच्या गजर घुमू लागला. बाळ – गोपाळ आनंदाने उड्या मारू लागले. उतरणाऱ्या प्रवाशांचे तसेच चालक वाचकांचे तोंड गोड करण्यात आले. गावात एखाद्या उत्सवासारखे वातावरण होते. भिंगाणहून टाकळीच्या दिशेने एसटी रवाना झाली. तेव्हा देखील मुलांनी शिट्ट्या वाजवत आनंदाला मोकळी वाट करून दिली. खऱ्या अर्थाने आज आमच्या गावात विकासाची पदचिन्हे उमटल्याची प्रतिक्रिया नाना शिंदे यांनी ‘ दै.प्रभात ‘ कडे व्यक्त केली.