समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी आ. पाचपुते- नागवडे- जगताप, या तीनही प्रमुख नेत्यांचे गट “सुरक्षित’ राहिले. मात्र त्याचवेळी दुसऱ्या फळीतील नेत्यांचे आधि प्रमुखांच्या समर्थकांचे गट “आरक्षित’ झाले आहेत. त्यामुळे गट-गणांच्या पुर्नरचनेप्रमाणे आरक्षण सोडतीतही पुन्हा एकदा त्यांचा हिरमोड झाल्याने समर्थकांचे गट आरक्षित अनऊ नेते पुन्हा सुरक्षित असे काहीसे चित्र श्रीगोंद्यात निर्माण णाले आहे. दरम्यान पंचायत समितीच्या चौदा गणांपैकी नऊ गण आरक्षित झाले असून पाच गण खुले आहेत.
नव्याने अस्तिवात आलेल्या पिंपळगाव पिसा गटात सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे तेथून माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी प्रणोती जगताप यांची उमेदवारी गृहीत धरली जात आहे. त्याचबरोबर मावळत्या सदस्या ताराबाई पंदरकर यांनाही पुन्हा नशीब आजमवण्याची संधी आहे.
कोळगाव गट अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने माजी सभापती पुरुषोत्तम लगड, हेमंत नलगे, प्रवीण घनश्याम शेलार यांची गोची झाली आहे. मांडवगण गटही अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने मावळत्या सदस्या सुवर्णा सचिन जगताप यांचा पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग खुंटला असून “नागवडे’चे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांचाही हिरमोड झाला आहे.
त्याचबरोबर आढळगाव गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मावळत्या सदस्या पंचशीला गिरमकर यांच्या दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत जाण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. तर जेष्ठनेते राजेंद्र म्हस्के, राष्ट्रवादीचे हरिदास शिर्के, विजय शेंडे यांचाही हिरमोड झाला आहे. बेलवंडी गटही अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने जेष्ठनेते अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा यांची सलग दुसऱ्यांदा गोची झाली आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्हा परिषदेच्या लिंपणगाव गटासह त्यातील पंचायत समितीचे दोन्ही गणही खुले राहिल्याने हा गट त्याअर्थी “नशीबवान’ ठरला आहे. येथून जिल्हा परिषदेसाठी नागवडे कुटुंबातील अनुराधा नागवडे, दीपक नागवडे, पृथ्वीराज नागवडे ही नावे चर्चेत आहेत, मात्र ऐनवेळी वांगदरीचे सरपंच आदेश नागवडे यांचेही नाव पुढे येऊ शकते.
येथे विरोधकांना सक्षम उमेदवार शोधण्यासाठी “कष्ट’ घ्यावे लागणार आहेत. पाच वर्षांपूर्वी खुला असलेला काष्टी गट आताही खुलाच राहिल्याने तेथून आ. बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांचे नाव आघाडीवर राहणार आहे. विरोधक पाचपुतेंच्या “होमग्राऊंड’वर कोणाला उतरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नशीब अजमावण्यासाठी तालुक्यातील कित्येकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र, आरक्षण सोडतीने अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. तालुक्यातील पाच गट आरक्षित झाले, मात्र त्याचवेळी आ. बबनराव पाचपुते यांचा काष्टी आणि ज्येष्ठनेते राजेंद्र नागवडे यांचा लिंपणगाव गट खुले राहिले. तर माजी आमदार राहुल जगताप यांच्या पिंपळगाव पिसा गटात त्यांच्या “मनाजोगते’ सर्वसाधारण महिलेचे आरक्षण पडले.
त्यामुळे नेत्यांचे समर्थक असलेल्या इच्छुकांचे चार गट आरक्षित अन् नेत्यांचे गट मात्र “सुरक्षित’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गट-गणांच्या “सोयी’च्या पुनर्रचनेनंतर आता आरक्षणेही तिन्ही प्रमुख नेत्यांच्या सोयीची निघाल्याने हा निव्वळ “योगायोग’ की अन्य काही अशा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
आढळगाव, पेडगावच्या आरक्षणाबाबत संभ्रम!
पूर्वीचे सहा गट आणि बारा गणांचे मागील चार पंचवार्षिक निवडणुकांतील आरक्षण डोळ्यासमोर ठेऊन नव्याने अस्तित्वात आलेल्या सात गट आणि चौदा गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यानुसार आढळगाव गट आणि पेडगाव गणाच्या आरक्षणाबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला असून त्यावर हरकती येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी आघाडीवर समीकरणे अवलंबून!
तालुक्यातील पिंपळगाव पिसा, लिंपणगाव आणि काष्टी या तीन गटांचे पारडे तेथील स्थानिक नेत्यांच्या बाजूने झुकते असल्याचे जाणवते. मात्र, आरक्षित झालेल्या अन्य चार गटांतील चित्र स्पष्ट होण्यास अवधी जाणार आहे. त्यातच तालुक्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत अद्याप संभ्रम असून तो दूर झाल्यानंतरच राजकीय समीकरणांचे आणि लढतींचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
============