कोलोंबो – श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय कोंडीवर उपाययोजना शोधणायासाठी राजकीय चर्चेला प्रारंभ झाला आहे. सत्तारुढ पक्षातील असंतुष्ट नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांबरोबर अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी चर्चा करायला सुरुवात केली आहे. महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यसाठी ही प्रदीर्घ चर्चा सुरू झाली आहे.
सर्व संबंधितांशी ही चर्चा बुधवारीही सुरू राहिल. पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली कोंडी लवकरच सुटेल, अशी आशा आहे, असे सत्ताधारी एसएलपीपी युतीतून फुटलेल्या स्वतंत्र गटाचे वरिष्ठ नेते अनुरा यापा यांनी पीटीआयला सांगितले.
मुख्य विरोधी पक्ष समगी जना बालवेगया (एसजेबी), सत्ताधारी पक्षाचे असंतुष्ट आणि अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र अजूनतरी त्यातून काही निष्पन्न झालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.
एसबीजेचे नेते सजिथ प्रेमदासा हे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानपद स्वीकारणार नाहीत. त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय समर्थन गमावले आहे, असे एसबीजेचे प्रवक्ते लक्ष्मण किरिएला म्हणाले.
दरम्यान, गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यास त्यांना अंतरिम सरकार बनवायचे आहे. त्यांनी राजीनामा न दिल्यास पक्ष अंतरिम सरकारला विरोधी पक्षाकडून बाहेरून पाठिंबा देईल, असे मार्क्सवादी जेव्हीपीने म्हटले आहे.