इस्लामाबाद – श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या चिनी कंपन्यांचे तब्बल 300 अब्ज रुपयांचे देणे पाकिस्तान सरकारकडे बाकी आहे. यामध्ये काही प्रमुख वीज कंपन्या आहेत. हे तीनशे अब्ज रुपये दिले नाहीत तर वीज उत्पादन थांबवण्याचा इशारा या कंपन्यांनी दिला असल्याने पाकिस्तान अंधारात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या उन्हाळी हंगाम सुरू असल्याने पाकिस्तानमध्येही विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वीज विभागाचे काम करणाऱ्या मंत्र्याने पाकिस्तानमधील चिनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीज उत्पादन वाढवण्याची सूचना केली. तेव्हा बहुतांशी वीज उत्पादक कंपन्या या चीनच्या असल्याने या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी आमचे 300 अब्ज रुपये पहिल्यांदा द्या त्यानंतर आम्ही वीज उत्पादन वाढवण्याचा विचार करू अशा स्पष्ट शब्दात पाकिस्तान सरकारला बजावले आहे.
पाकिस्तानमध्ये चीनच्या 30 पेक्षा जास्त कंपन्या काम करत असून बहुतांशी कंपन्यांकडे वीज उत्पादनाचे काम आहे. पाकिस्तानवर सध्या जो कर्जाचा डोंगर आहे त्यापैकी 20 टक्के हिस्सा फक्त चीनच्या कर्जाचा आहे. आता या वीज कंपनीने आपले 300 अब्ज रुपये जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही जनरेटर सुरू करणार नाहीत अशी भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तान सरकारच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
चीनमधील अनेक कंपन्या पाकिस्तानमध्ये वीज उत्पादन रेल्वे आणि दळणवळण या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे वीज उत्पादनप्रमाणेच इतर क्षेत्रातीलही या चिनी कंपन्यांचे देणे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरकारला वीज उत्पादन वाढवायचे असेल तर त्यांनी आमचे देणे प्रथम द्यावे आणि त्यानंतर वाढीव उत्पादनासाठी ऍडव्हान्स रक्कम द्यावी अशी भूमिकाही आता या वीज कंपन्यांनी घेतल्याने पाकिस्तान सरकारच्या आर्थिक अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.