कोपर्डे हवेली – बऱ्याचशा तिखटाच्या शौकीन लोकांना रोजच्या जेवणात झणझणीत रस्सा असल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. हे जरी खरे असले तरी सध्या बाजारपेठेत मिरची, कांदे, लसूण व इतर मसाले पदार्थांचे दर गगनाला भिडले असल्याने रोजच्या जेवणातील तिखटपणा कमी झालेला दिसून येत आहे.
सर्वत्र निर्माण झालेल्या महापूरजन्य परिस्थितीमुळे कांदे, लसूण पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आवक घटून दर वाढलेले आहेत. या परिस्थितीत बजेट सांभाळून वर्षभर पुरेसा मिरची मसाला (चटणी) बनवताना महिला वर्गाला अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. बाजारात कमी दरात तयार मिरची मसाला मिळत असला तरी गृहिणींचा कल घरगुती पद्धतीने बनवलेल्या तिखटाकडे जास्त असल्यामुळे हे खरेदी करावे लागत असल्याने आर्थिक वेळापत्रक कोलमडत आहे.
शहरी व ग्रामीण भागात साधारणपणे दिवाळीनंतर वर्षभरासाठी मिरची मसाला करुन ठेवण्याचे वेध महिलांना लागलेले असते. यावेळी मात्र चटणीसाठी लागणाऱ्या सर्वच मसाले पदार्थांचे दर वाढल्यामुळे चटणीसाठी होणारा खर्च दुप्पटीने वाढला आहे. त्यामुळे महिलांची स्वयंपाक घरातील बजेटची जुळवाजुळवी करताना चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मसाल्यांचे दर प्रति किलो
मिरची -200 ते 240
कांदे – 50 ते 130
लसूण – 200 ते 215
खोबरे- 150 ते 170
इतर – 200 रुपये
मजुरी – 40 ते 50