स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत, लेखक, धर्मकोश व विश्वकोशाचे संपादक, प्रशासक व वक्ते म्हणून ओळखले जाणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आज स्मृतिदिन.
त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे 27 जानेवारी 1901 रोजी झाला. कर्मकांडावर विश्वास नसणारे; पण चारही वेदांवर अधिकारवाणीने विवेचन करणारे आधुनिक विचारसरणीचे प्रकांडपंडित म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे औपचारिक प्राथमिक शिक्षण पिंपळनेर येथेच तिसरीपर्यंत झाले. त्यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी ते वाई येथे नारायण शास्त्री मराठे तथा स्वामी केवलानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या प्राज्ञ पाठशाळेत शास्त्राध्ययन करण्यासाठी दाखल झाले. शास्त्रीबुवा जेव्हा पाठशाळेत दाखल झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावर जटा वाढल्या होत्या. त्यांचा अवतार पाहून नारायणशास्त्रींनी आधी त्यांच्या जटा सोडवल्या, मग ते इतर विद्यार्थ्यांबरोबर पाठाला बसले. पण काही समजेना म्हणून ते रडू लागले.
गुरुजींनी त्यांना जवळ घेऊन शांत केले आणि नंतर त्यांना एकट्यालाच शिकवून इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीला आणले. कुशाग्र बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती यामुळे ते लाडके शिष्य झाले. गुरूंच्या आदेशानुसार ते आपल्याहून मोठ्या विद्यार्थ्यांचेही पाठ घेऊ लागले. पुढे न्यायशास्त्रात “तर्कतीर्थ’ ही पदवी मिळवून आपल्या गुरूंचे उत्तराधिकारी बनले.
वर्ष 1917 मध्ये विनोबा भावे पाठशाळेत शिकण्यासाठी वाईला आले. त्यांनी नारायणशास्त्रींना “अस्पृश्यांना वेद शिकवाल का?’ असे विचारल्यावर ते “होय’ म्हणाले आणि विनोबांनी पाठशाळेत प्रवेश घेतला. तिथे आल्यावर अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे विनोबांनी सदरा-टोपी टाकून न शिवलेले कपडे अर्थात पंचा गुंडाळून किंवा धोतर नेसण्यास सुरुवात केली. शास्त्रीजींनी विनोबांवरच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे, विनोबांनी गांधीविचार पाठशाळेत आणला आणि पाठशाळेचा “ड्रेस कोड’ गांधी आश्रमात पोहोचवला.
विद्यार्थिदशेतील लक्ष्मणशास्त्रींवर विनोबांचा प्रभाव पडला. त्यांच्याबरोबर इंग्रजीचे धडे घेऊ लागले. त्यामुळे अधिक इंग्रजी वाचायची त्यांना ओढ निर्माण झाली. प्राज्ञपाठशाळेत शिकत असताना वाई येथे ते माधुकरी मागून पोटपूजा करीत असत. प्राज्ञपाठशाळा पारंपरिक पठडीतील; पण काहीशा आधुनिक दृष्टीची व राष्ट्रीय बाण्याची होती. प्राज्ञपाठशाळेत शास्त्रीजींनी सुमारे बारा न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. येथे शिक्षण घेत असताना परंपरागत शास्त्र व इंग्रजीप्रधान आधुनिकता यांचा मेळ घालून अध्ययन केले. वर्ष 1923 मध्ये कोलकाता येथील शासकीय संस्कृत महाविद्यालयातून तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. त्यांचा वर्ष 1927 मध्ये मुल्हेरच्या पंडित घराण्यातील सत्यवती यांच्याबरोबर विवाह झाला. निसर्गरम्य कृष्ण काठावर असलेल्या प्राज्ञपाठशाळेस त्यांनी आपले जीवन समर्पित केले आणि तेथेच राहिले. त्यांना दोन मुले व दोन मुली झाल्या. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मधुकर हे अमेरिकेत गणकयंत्रनिर्मिती करणाऱ्या इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स या उद्योगसंस्थेत संशोधन व्यवस्थापक पदावर काम करीत होते.
वर्ष 1930 व 1932 मध्ये त्यांनी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला व दोन वेळा सहा महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. मात्र नंतर वर्ष 1936 मधे समाजवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीचे ते क्रियाशील सदस्य झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे परमस्नेही यशवंतराव चव्हाण हेही या पक्षात सामील झाले. दोघेही मित्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कॉंग्रेस पक्षात हयातभर राहिले. प्राचीन व आधुनिक ज्ञानपरंपरांचा समन्वय साधणाऱ्या शास्त्रीजींचा मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतीय प्रबोधनाचे सर्वोत्कृष्ट अपत्य अशा शब्दांत गौरव केला होता.
शास्त्रीजी धर्मसुधारणावादी असल्याने त्यांनी वर्ष 1925 मध्ये कुकुरमुंडे येथील सनातन धर्मपरिषदेत धर्मसुधारणेचे समर्थन केले. त्याच वर्षी वाराणसी येथील संस्कृत पंडित संमेलनातही त्यांनी धर्मसुधारणेची बाजू मांडली. भारताच्या राज्यघटनेचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचे कार्यही त्यांनी केले. वर्ष 1951 मधे सोरटीसोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी पौरोहित्य करण्याचा मान शास्त्रीजींना लाभला. मार्क्सवादी चिकित्सा पद्धतीने वर्ष 1941 मधे शास्त्रीजींनी हिंदू धर्माची समीक्षा केली. चिकित्सा पद्धतीच्या मर्यादा पाहून मग त्यांनी स्वतंत्रपणे व्यापक दृष्टीने वैदिक संस्कृतीचे समीक्षण केले. त्यांनी वर्ष 1985 मधे हिंदुधर्मसमीक्षा व सर्वधर्मसमीक्षा या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात शास्त्रीजींनी जडवादाची ओळख करून दिली. तसेच आद्य शंकराचार्यांच्या जीवनकार्याचे स्वतंत्रपणे व समतोलपणे दर्शन घडविले आहे. शास्त्रीजींच्या पुरोगामी विवेकबुद्धीची प्रचिती त्यांच्या “जोतिनिबंधां’तून येऊ शकते.
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य संस्कृती मंडळाची वर्ष 1960 मध्ये शास्त्रीजींच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली. जगातील सर्व ज्ञान एकत्रितपणे मिळाले पाहिजे यासाठी विश्वकोश निर्मितीचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. यासाठी वाई येथे मोठे ग्रंथालयच उभारले. अनेक देशातील विविध विषयांची पुस्तके व भाषांतरे उपलब्ध करून दिली. भारतातील नामवंत संशोधक, लेखक, अभियंते यांना वाई येथे पाचारण करून त्यांच्या राहण्यासाठी अभ्यागत निवास उपलब्ध करून दिला. दादासाहेब रुपवते, प्रा. सदाशिव आठवले, चित्रकार जि. भि. दीक्षित, रा. ग. जाधव, मराठवाडा दैनिकाचे अच्युत खोडवे, डॉ. सु. र. तथा भैय्यासाहेब देशपांडे अशी अनेक नावे घेता येतील.
प्रकाशनासाठी सुसज्ज शासकीय मुद्रणालय वाई येथे उभारले. त्यामुळे वाईमध्ये रोजगाराच्या संधीही 50 वर्षांपूर्वी उपलब्ध झाल्या. विश्वकोशाचे सुमारे 21 खंड प्रकाशित झाले आहेत. एका खंडामधे मोठ्या ग्रंथ पृष्ठाची साधारण 1000 ते 1200 पृष्ठे आहेत. सूचिखंड दोन खंडामध्ये सामावला आहे. त्यावरून त्याच्या अवाढव्य विस्ताराची कल्पना येते. तेथे चौदा विद्या, चौसष्ट कलांसह शास्त्र(सायन्स), इतिहास, चरित्रे, भूगोल, खगोल, कला, नाट्य, संगीत सर्व काही एकाच ठिकाणी बघण्यास मिळते. शास्त्रीजींच्या पश्चात मे. पु. रेगे यांनी सर्व विश्वकोशांचे संगणकीकरण केले.
मला वर्ष 1975 ते 1976 च्या दरम्यान विश्वकोशाचे नकाशा विभागात काम करण्याची संधी मिळाली होती. सर्व लेखक ब्रिटानिका एन्सायक्लोपिडिया, एन्सायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स तसेच फ्रेंच व अमेरिकन एन्सायक्लोपिडियाचा मार्गदर्शक म्हणून वापर करीत. त्यावेळी ब्रिटानिका एन्सायक्लोपिडियामध्ये “मानसरोवर’ असा उल्लेख दिसला. हा उल्लेख योग्यच आहे. पण बरेचजण “मानससरोवर’ असाच उच्चार करतात. मराठी, हिंदीमध्ये काही ठिकाणी मानससरोवर तर काही ठिकाण मानसरोवर असा उल्लेख येत होता. अखेर संबंधित लेखक आबांकडे गेले. शास्त्रीजींना आबा या नावाने कर्मचारी वर्ग ओळखत असे. अडचण सांगितल्यावर आबांनी “मानसरोवर’ असा उल्लेख असलेले संस्कृत वचन लगेचच म्हणून दाखविले.
वर्ष 1954 मध्ये दिल्ली येथे त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्र स्तरावरील साहित्य अकादमीचे पुरस्कार वर्ष 1955 मध्ये सुरू झाले व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना मराठीचा साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार पहिल्याच वर्षी वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथासाठी देण्यात आला. वर्ष 1976 मधे पद्मविभूषण पदवीने सन्मानित करण्यात आले. वाई येथे त्यांच्या नावे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हायस्कूल चालविले जाते. महाबळेश्वर येथे 27 मे 1994 रोजी त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस