– सूर्यकांत पाठक
बाजारामध्ये गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे भाव कमालीचे वाढत चालल्याचे दिसून आले आहे.
भारतीय शेअर बाजाराने यापूर्वीचे सार्वकालिक उच्चांक मोडीत काढून नवे ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. 65 हजारांपल्याड गेलेला सेन्सेक्स आणि 19,300 च्या पुढे गेलेला निफ्टी यामुळे भारतीय शेअर बाजाराची जगभरात चर्चा आहे. एप्रिल महिन्यापासून शेअर बाजारात दिसून आलेल्या सातत्यपूर्ण तेजीमागे जी प्रमुख कारणे आहेत त्यामध्ये भारतातील महागाईच्या दरात झालेली घसरण हे एक प्रमुख कारण आहे. कारण रशिया-युक्रेन युद्धानंतर संपूर्ण जग महागाईशी लढत आहे आणि जागतिक मध्यवर्ती बॅंका ही महागाई कमी करण्यासाठी व्याजदरवाढीचा हुकमी एक्का वारंवार वापरत आहेत. भारतातही रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात मागील काळात वाढ केली. परंतु गेल्या काही महिन्यांत महागाईचा दर घसरणीकडे सरकू लागल्याने आरबीआयने व्याजदरवाढीला स्थगिती देण्याचे धोरण अवलंबलेले दिसले. अलीकडेच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर (डब्ल्यूपीआय) मे महिन्यात उणे 3.48 टक्क्यांवर पोहोचला असून तो 2015 च्या नीचांकी पातळीवर विसावल्याचे दिसले. महागाईचा दर घसरत असताना सर्वसामान्यांच्या खिशावरील भार मात्र कमी होताना दिसत नाहीये.
काही महिन्यांपूर्वी किंमत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. आता याच टोमॅटोने भावात उच्चांकी पातळी गाठली आहे. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात 20-30 रुपये किलो दराने मिळणारा टोमॅटो आजघडीला 100 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे. संपूर्ण देशभरात टोमॅटोच्या किमतींनी उचल खाल्ली आहे. ठोक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने किमती वाढत असल्याचे कारण सांगितले जात आहे. वास्तविक, आवक संदर्भातील आकडे व्यापाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांना फोल ठरविणारे आहेत. विशेष म्हणजे देशभरात भाववाढीची कारणे वेगवेगळी सांगितली जात आहेत. उत्तर भारत, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसामुळे पिकांची नासाडी झाली असून त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे, असे टोमॅटोच्या भाववाढीबाबत सांगितले जाते; तर महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने टोमॅटो महागल्याचे व्यापारी सांगतात. या दरवाढीमुळे सामान्यांच्या रोजच्या आहारातून टोमॅटो गायब होताना दिसत आहे.
प्रश्न फक्त टोमॅटोच्या दरांचाच नाही. अन्यही भाजीपाला कमालीचा महागला आहे. फरसबीने तर 200 रुपये किलो असा उच्चांकी दर गाठला आहे. त्याखालोखाल हिरवी मिरची 160 रुपये प्रति किलो आणि कोथिंबीर 50 रुपये जुडीने विकल्या जात आहेत. बाजारात फुलकोबी, भेंडी, दोडकी आणि वांग्याचा दर 80 रुपये प्रति किलो झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत 10-15 रुपयांना मिळणाऱ्या मेथी, पालक, लाल माठ यांसारख्या पालेभाज्या पुण्या-मुंबईसारख्या महानगरात 30-50 रुपयांपर्यंत कडाडल्या आहेत. भाजीपाल्याच्या वाढत्या किमती तात्पुरत्या असून लवकरच भाव नियंत्रणात येतील, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु लांबलेला मान्सून पाहता गणेशोत्सवाच्या काळातही भाजीपाला महागलेलाच राहील असे दिसते.
देशभरात नगदी पिकांत भाजीपाला हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. मात्र विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनात नुकसान सहन करावे लागते. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी, मुसळधार पाऊस तर कधी अन्य कारणे. या सर्वांचा सामना करत पिकवलेला भाजीपाला बाजारात आणल्यानंतर व्यापारी त्यांना अक्षरशः कवडीमोल किंमत देऊन खरेदी करतात. दलाली आणि नफेखोरी करणारे लोक हे अक्षरशः निम्म्याहून अधिक दराने शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करतात आणि मनमानी भाव आकारून विकतात. शेतकऱ्यांकडे भाजीपाला ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते. शीतगृहे नसतात. उत्पादनासाठी केलेला खर्च काहीही करून भरून कसा निघेल यावर शेतकऱ्याचा भर असतो. याचा अडते, दलाल, व्यापारी, घाऊक विक्रेते अचूक फायदा घेतात. टोमॅटोबाबत तर ही बाब प्रकर्षाने दिसून आली आहे. शेतकऱ्यांकडून 5-10 रुपये किलो दराने घेतलेले टोमॅटो आज व्यापारी 100-120 रुपये किलो दराने विकत आहेत.
कितीही कायदे केले तरी शेतमाल बाजाराची अर्थव्यवस्था ही सट्टेबाज आणि दलालांच्या हातीच राहिलेली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात खाद्यपदार्थांचे भाव कितीही वाढले तरी शेतकऱ्यांना त्यांचा फायदा मिळतोच असे नाही. चढ्या भावांमधील बहुतांश वाटा मध्यस्थच गडप करतात. शेतकरी बिचारा तसाच कवडीमोल भाव पदरात पाडून घेऊन जगत राहतो. आज बाजारात डाळींचे भाव कमालीचे वधारले आहेत. तूरडाळ, मूगडाळ यांसारखी रोजच्या आहारातील प्रथिनांचा सर्वांत महत्त्वाचा स्रोत असणारी धान्ये 150 रुपये किलो दराने विकली जात आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून या डाळी 50 ते 60 रुपये किलो दराने घेतलेल्या असतात. याचाच अर्थ मध्यस्थांची साखळी दुप्पट नफा मिळवताना दिसते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना थेट शेतमाल विकण्यासंदर्भात कायदा करण्यात आला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला; परंतु प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत शेतमाल उत्पादन घेताना आणि उत्पादनपश्चात कराव्या लागणाऱ्या कामांनी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याकडे विपणनासाठीचे तंत्र उपलब्ध नसते.
परिणामी तो आजही बाजार समित्यांची वाट धरतो किंवा मध्यस्थ, व्यापारी, दलाल यांच्याकडे शेतमाल विकून एकहाती रक्कम पदरात पाडून घेण्यात धन्यता मानतो. कारण त्याच्याकडे साठवणुकीची क्षमता नसते. अडते, दलाल, व्यापारी हे या उणिवेचा अचूक फायदा उठवतात आणि मातीमोल दरात शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून घेऊन बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने विकतात. वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या या व्यवस्थेमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही भरडले जातात आणि मूठभर दलाल बक्कळ नफा मिळवून मोकळे होतात. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे अधिक जाणार असतील, तर सामान्य माणूस कधीच त्याला हरकत घेत नाही; पण बाजारात भाववाढ झाल्याचा फायदा शेतकऱ्यालाही मिळणार नसेल तर सामान्यांकडून त्या महागाईबाबत संताप व्यक्त केला जातो. आज मान्सूनने दिलेल्या दडीमुळे शेतमाल उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, हे वास्तव आहे. परंतु त्याचा फायदा मध्यस्थांकडून घेतला जाऊ नये, हीच सामान्यांची अपेक्षा आहे आणि ती गैर म्हणता येणार नाही.