बारामती-बारामती-फलटण-लोणंद या 63 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी आवश्यक ते भूसंपादन लवकरात लवकर करण्यात येणार आहे. बारामती तालुक्यातील 13 गावांतील नागरिकांची भूसंपादनासाठी सकारात्मकता दर्शविली असून उर्वरित चार गावांतील नागरिकांशी चर्चा करून जागा संपादीत केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच याविषयीची आढावा बैठक घेतली. बारामती, फलटण, लोणंद या एकूण 63 किलोमीटरपैकी 37 किलोमीटर रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जात आहे. त्यासाठीच्या भूसंपादनासाठी 239 कोटी रुपये आवश्यक असून 115 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित भूसंपादन समन्वय व सामंजस्याने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.