नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल इस्त्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले. इस्त्रोची कामगिरी सर्व भारतीयांच्या आणि विशेषत: तरूण पिढीच्या दृष्टीने प्रचंड अभिमानाचा विषय आहे.
अनेक दशकांपासून इस्त्रोच्या उल्लेखनीय क्षमता विकसित झाल्या. इस्त्रोला पुढे नेण्यात त्या संस्थेला नेहमी लाभलेले उल्लेखनीय नेतृत्व आणि सामूहिक प्रयत्नांच्या भावनेचा मोलाचा हातभार लागला.
इस्त्रोची यशस्वी वाटचाल 1960 च्या दशकापासून स्वावलंबनाच्या आधारावर झाली, असे सोनियांनी म्हटले. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचे श्रेय भाजपकडून इस्त्रोबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर, अवकाश कार्यक्रमात आमच्याही आधीच्या सरकारांचे योगदान असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जात आहे.