नवी दिल्ली – मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील. मात्र त्यामागे असणारी सरकारची भावना मात्र स्वच्छ होती, असे परखड मत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. तसेच देशातील 130 कोटी लोकांचा लोकशाहीवरील विश्वास अजून वाढला आहे हेच मोदी सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (फिक्की) 94व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. अमित शहा म्हणाले, निर्णय चुकीचा आहे असे होऊ शकते. पण भावना मात्र चुकीची नव्हती. आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचे मान्य करतात. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
करोना संकटादरम्यान सरकारने असे अनेक निर्णय घेतले ज्याचा फायदा पुढील बऱ्याच काळापर्यंत होईल. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकी झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दीड वर्षाहून अधिक काळ 80 कोटी लोकांना प्रती व्यक्ती /दर महिना मोफर अन्न देण्याचं काम भाजपाच्या मोदी सरकारने केले आहे. हे खूप मोठं काम असून, जगात कोणीही असे केलेले नाही. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने आपल्या मार्गावर येत आहे.
1972 पासून आजपर्यंत देशाच्या विकासात फिक्कीचे योगदान आहे. आता ते योगदान अनेक टक्क्यांनी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावें आणि इतर क्षेत्रांचाही विचार करावा ही वेळ आली आहे. फिक्कीसारख्या संघटना पुढे आल्या तरच आत्मनिर्भर भारताचं ध्येय पूर्ण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.