सातारा – साताऱ्यात करोना व्हायरसची प्रचंड भीती असताना शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेबाबत अक्षम्य बेजबाबदारपणा दिसून येत आहे. शहराचे चौक आणि कोपऱ्यांमध्ये साठणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांनी संक्रमणाचा धोका वाढवला आहे. त्यामुळे सातारा शहराच्या स्वच्छतेचे कुछ करोना अशी गळ आरोग्य विभागाला घालण्याची वेळ आली आहे.
जुनी भाजी मंडई, विसावा पार्क नाका, बारटक्के चौक, पंचायत समिती आवार, राजवाडा पार्किंग जागा, बाजार समितीचा आवार, मोळाचा ओढा व सदाशिव पेठ मच्छी मार्केट म्हणजे शहराच्या एक तृतीयांश भागात सार्वजनिक स्वच्छतेचा अक्षरशः लपंडाव सुरू आहे. सकाळी आठ वाजता घंटागाडी कचरा भरून गेल्यावर पुन्हा कचऱ्याचा कंटेनर तासाभरात भरून जातो.
राधिका रोडवरील बारटक्के चौकात हा खेळ मोठ्या प्रमाणावर चालतो. प्लॅस्टिकचे ढीग आणि कचरा यामध्ये बायोमेडिकल वेस्ट सर्रास आढळून येते. यामुळे कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचे कामगार अनेक वेळा जखमी झाले आहेत. या कचऱ्याच्या ढीगा पलिकडेच कलिंगड विक्रेते बसतात.
या कचऱ्यावरच्या माशा पुन्हा कलिंगडावर बसतात, त्यामुळे या चौकात आरोग्याची हेळसांड सातत्याने सुरू असते. भवानी पेठ व प्रतापगंज पेठेला जोडणाऱ्या डीसीसी बॅंकेच्या पुलासह पालिकेच्या पार्किंगमध्ये कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. येथे चायनीज विक्रेते चिकन व मासांचे तुकडे आणून टाकत असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मोळाचा ओढा, मार्केट यार्ड, एसटी स्टॅन्ड परिसर या गर्दीच्या ठिकाणी तर कचरा हटण्याचे नाव घेईना झाला आहे.
ठेकेदार कंपनीचा ठेका संपल्याने स्टॅन्डमध्ये कचरा उचलण्यासाठी कामगार नसल्याने मोठी अडचण झाली आहे. सदाशिव पेठ मच्छी मार्केटमध्येसुध्दा स्वच्छता नसल्याने सांसार्गिक रोगाच्या साथी पसरू शकतात. धूर फवारणी व पावडर टाकणे या पलिकडे आरोग्य विभाग कोणत्याही उपाययोजना करत नाहीत. पावडर लाच मुंग्या लागण्याचे अनेकदा प्रकार घडले आहेत.
घंटागाड्यांचा बी प्लॅन कागदावरच
स्वच्छता ठेकेदारांची मुदत अंतिम टप्प्यात असताना करोना व्हायरसच्या भीतीचा साताऱ्यात जोरदार संसर्ग आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक स्वच्छतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन होत असताना साताऱ्यात कचऱ्याची बजबजपुरी माजली आहे. ठेकेदारांची मुदत 24 मार्च रोजी संपत आहे. तर पालिकेच्या बारा घंटागाड्यांचे पासिंग झाले आहे. या पासिंगच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी वारंवार येत असल्याने आरोग्य विभागाची स्वतःची कार्यक्षम व्यवस्था पुरेशा ताकतीने सक्रीय झालेली नाही. सध्या तरी शहर स्वच्छतेचा प्लॅन बी कागदावरच राहिला आहे.