माढा – भारत शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप व सवलती मिळतात. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच बार्टीच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांनी केले.
सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालयमध्ये विशेष कक्ष व समाजशास्त्र विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावतीने विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
सरकारकडून मिळणार्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती प्रत्यक्ष पद्धतीने विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. भारत शासनाकडून व महाराष्ट्र सरकारकडून मिळणार्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे बार्टीचे प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, समतादुत राजश्री कांबळे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती संघर्ष केला होता. त्याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या शाळा प्रथम दिनाचे औचित्य साधून आपले जीवन सफल केले पाहिजे, असे मत राजश्री कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तानाजी देशमुख, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. बापू राऊत, प्रा. नीता पोलाशी, प्रा. डॉ. संगीता भोसले, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.