देऊळगाव राजे – सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे फसवणुकीच्या प्रमाणत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामध्ये जास्त आता समाजातील सुशिक्षित तरुणांना जाळयात ओढण्याचे काम चालू आहे. सध्या सोशल मिडियाचा तरुणांना फसवण्यासाठी चोरांकडून प्रभाविपणे वापर केला जात आहे.त्यामधून वेगवेगळ्या प्रकारे तरुणांना व्यवसायाची सुवर्णसंधी दिली जाते. महिन्याला लाखो रुपये कमवा अशी जाहिरात दिली जाते.
दौंड तालुक्यासह महाराष्ट्र राज्यतील आता प्रत्येक तालुक्यात फ्रैंचायजी देणे आहे, नोकरी देणे आहे. एखाद्या नवीन कंपनीची एजन्सी देऊन घर बसल्या हजारो रुपये कमवा, अशा प्रकारच्या विविध जाहिराती सोशल मिडियावर पाठवून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना फसवण्यात येत आहे. तरूणांनी अशा कोणत्याही खोट्या अमिषाला बळी पडण्यापासुन सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी अशी कुठलीही जाहिरात आली तर पहिल्यांदा कंपनीची स्थापना, ऑफिस, अनुभव, डायरेक्टर असतील तर त्यांच्या बॅकग्राऊंड संबधी सखोल माहिती घेणे गरजेचे आहे.
कुठलाही व्यवसाय केल्यास लाखो रुपये फायदा होईल असे वाचण्यात आल्यास प्रथम ते आमिष आहे का? ते समजून घ्यावे. आपल्या अल्प फायद्यासाठी मित्र, नातेवाईक, विद्यार्थी यांना माहिती नसल्यास खोटा विश्वास देऊ नये, कगदावरती केलेले प्लानिंग सत्त्यात प्रत्येकवेळी उतरेलच असे नाही. त्यामुळे सदर व्यावसायात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यास वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ यावर अशा प्रकारे जाहिराती केल्या जातात. पण त्यांना काही बंधने असतात. पण सोशल मीडियावरील जहिरातीसाठी कुठलेही तसे बंधन दिसत नाही. त्यामुळे आजकाल लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते सर्वच काही ऑनलाइन घरपोच अगदी सहज मिळू लागले आहे. पण वाढत्या वापरामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रमाणही वाढले आहे.
ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमांतून नागरिकांना विविध आमिषे दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सायबर सेलकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही नागरिक या आमिषांना बळी पडत आहेत. यामध्ये अनेकांची काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत फसवणूक होत आहे. ऑनलाइन पध्दतीने फसवणूक करणारे परदेशातून तसेच परराज्यांतून सूत्रे हाताळत असल्याने त्यांना जेरबंद करण्याचेही मोठी आव्हान पोलिसांपुढे असते.