मुंबई : कर्नाटक विधासनसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु आहे. त्यातच महाराष्ट्राच्या सीमाभागात देखील याचा प्रचार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील जनतेने मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे म्हटले होते. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे.
‘धार्मिक आवाहन केले म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता पण कदाचित आता नियम बदलले असतील. देशाचे पंतप्रधानच हिंदूत्वाचा प्रचार करत असतील तर कर्नाटकातील मराठी जनतेने देखील मतदान करताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणा आणि मतदान करा’, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केले आहे.
मराठी बांधवांच्या हित जपणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांना मत द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘प्रत्येक पक्षाला पक्षंतर्गत बदल करण्याचे स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर मी त्यानवर बोलेन. माझ्याकडून तरी महाविकास आघाडीला कोणताही तडा जाणार नाही. महाविकास आघाडीला तडा जाईल असं काहीही राष्ट्रवादीत होणार नाही.’
शरद पवारांचे आत्मचरित्र “लोक माझे सांगाती”मध्ये या आत्मचरित्रात शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात दोनदा जाण्यावर टीका केली आहे. यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवारांना सल्ला देणारा मी कोण? दिलेला सल्ला त्यांना पचनी पडेल का?बारसूमध्ये मी आमच्या लोकांना भेटायला जातोय, राज्यातील इतर प्रकल्प गुजरातला जात आहेत. पालघरमध्ये लोकांना घरात घुसून बाहेर काढलं असे म्हणत उध्दव ठाकरेंनी टीका केली. प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती नको असे वक्तव्य ठाकरेंनी केले आहे.