नगर -यंदा करोनामुळे कापूस खरेदी केंद्रे बंद होती. त्यात कारखानदार, व्यापारी कापसाची खरेदी करत नाहीत. त्यामुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून द्यायचा काय? जर खरीप पिकाच्या आधी कापसाची खरेदी झाली नाही, तर त्याचा खरिपावर मोठा परिणाम होईल. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसेल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांकडील कापूस तातडीने खरेदी करुन शेतकऱ्यांचे गुंतलेले पैसे तातडीने मोकळे करुन द्यावेत, अन्यथा लॉकडाऊन उठले की मुख्यमंत्री, पणनमंत्र्यांच्या दारात अंदोलन करण्यात येईल, असा इशारा दहातोंडे यांनी दिला आहे.
करोना संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात कापूस खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कापसाच्या पैशावरच खते, बी-बियाणे व अन्य बाबी खरेदी केल्या जातात. आता मागणी नसल्याने कारखानदार, व्यापारी कापूस खरेदी करत नाहीत. सरकारी यंत्रणा याबाबत दखल घेणार आहे की नाही.
कापूस खरेदीचे केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. प्रत्यक्षात कापूस खरेदी मंद गतीने सुरु आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर खरिपापर्यंत अर्ध्या लोकांचीही कापूस खरेदी होणार नाही. याचा विचार करुन शासनाने तातडीने कापूस खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. करोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत आलेले आहेत त्यांना सरकारकडून आता मदत न मिळाल्यास राज्यात अनर्थ घडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे दहातोंडे म्हणाले.