मुंबई : राज्यात काही दिवसापासून चर्चेचा विषय ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आले आहे. दरम्यान, उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून पक्षाच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद असल्याचे म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी, आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस…साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद.
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 8, 2020
भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले. दरम्यान, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्ष नेतृत्वाला केलेलं आव्हान आणि पक्षविरोधी केलेली वक्तव्ये त्यांना भोवली असल्याचे बोलले जात आहे.