कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचे मत
पुणे – ‘भारतरत्न व्यक्ती किंवा कलावंतांवर’ दबावाने आपल्या मर्जीप्रमाणे कोणी कॉपी-पेस्ट’ ट्विट करवत असतील किंवा करण्यास बाध्य करत असतील, तर त्याची चौकशी होणे हा भारतरत्नांचा अपमान नाही. कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व सुरक्षेची खातरजमा करणे हे राजधर्माचे पालनच आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आज पुणे येथे केले.
भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या भारतरत्नांच्या अपमानविषयी केलेल्या निवेदनावर तिवारी यांनी पुणे येथे मत व्यक्त केले.
कोट्यवधी नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ट्विटरवर व्यक्त होत असतांना, ट्वीटर खाते बंद करू म्हणून नोटीस देणाऱ्या केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे. 70 वर्षे लोकशाही नांदत असलेल्या देशात धाक-दपटशहा व मनमानी चालू शकत नाही, याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.
प्रधानसेवकांनी लोकसभेतून देशाला संबोधित करण्याऐवजी, कृषी कायद्यावर चर्चा घडवून राज्यसभेतील विरोधी सदस्यांच्या शंकांचे निरसन केले असते व घटनात्मकरीत्या विधेयक मंजूर वा नामंजूर केले असते, तर आज एवढी कसरत करावी लागली नसती, असेही तिवारी यांनी निवेदनात म्हटले आहे.