सोशल मीडियावरून पसवरण्यात येणाऱ्या अफवा आणि अंधश्रद्धा या करोनाविरुद्धच्या लढाईत मोठा अडसर ठरत आहेत. बरे होण्यासाठी किंवा सुरक्षित राहण्यासाठीच्या या अशास्रीय किंवा उथळ उपायांमुळेही आरोग्य समस्या आणखी जटील आणि किचकट बनण्यास हातभार लागू शकतो.
सामान्य स्थितीत आपण कोणत्याही भारतीय नागरिकांना एखाद्या आजाराचा उल्लेख केला तर तो तात्काळ ऍलोपथीपासून आयुर्वेदापर्यंत सर्व प्रकारचे उपचार सांगेल. परंतु व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटीने तर देशातील बहुतांश लोकांना करोना तज्ज्ञ केले आहे. या आधारावर करोना संपणार नाही, तर उलट अन्य आजारांचा फैलाव होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला अन् अनेकांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी गोशाळेचा मार्ग धरला. संसर्ग वाढण्याची भीती त्यांना वाटली नाही. जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ हे लोकांना पर्यायी उपचार करू नयेत, असे वारंवार सांगत आहेत. सोशल मीडियामुळे माहितीची क्रांती झाली असली, तरी काहींसाठी जीवघेणी ठरत आहे.
तज्ज्ञांच्या मते, बरे होण्याची किंवा सुरक्षित राहण्याची खोटी भावना ही आरोग्य समस्येला आणखी जटील आणि किचकट करू शकते. करोना संसर्गापासून बचाव आणि उपचारासाठी सरकारने तयार केलेल्या गाइडलाइन्सचे पालन करायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधांचे सेवन करायला हवे. याप्रमाणे करोनावर अंकुश ठेवण्यासाठी लस महत्त्वांची भूमिका बजावत असताना त्यावरून पसवरण्यात येणाऱ्या अफवा या करोनाचा प्रसार करण्यासाठी पोषक ठरत आहेत.
करोना संसर्गामुळे देशाची स्थिती अजूनही गंभीर आहे. दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक जणांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. करोनाची दुसरी लाट भीतीदायक असून सर्वांची झोप उडवणारी आहे. त्यामुळे नागरिक बचावासाठी थातूरमातूर आणि विश्वसीय नसलेल्या उपचाराचा आधार घेत आहेत. विशेषत: सोशल मीडियावरच्या खोट्या माहितीला बळी पडत आहेत. हेच उपचार काही वेळा जीवघेणे ठरत आहेत.सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
त्यात एक कुटुंबातील महिला ऑक्सिजन बेडवर असलेल्या एका रुग्णाजवळ बसून जोरजोरात धार्मिक पठण करताना दिसते. कालांतराने त्यांनी पाठ ऐकण्यासाठी रुग्णाचे ऑक्सिजन काढले. परिणामी ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. अलीकडेच महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका डॉक्टरने देशी दारूने 50 हून अधिक रुग्णांवर उपचार केल्याचा दावा केला. ही बातमी काही क्षणात व्हायरल झाली. मात्र सरकारने हा दावा चुकीचा असल्याचा सांगत संबंधितावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
अन्य एका व्हॉट्सऍप मेसेजमध्ये म्हटले की, पुदुुच्चेरीचा एक विद्यार्थी रामू याने कोविडवर घरगुती उपचार शोधून काढले आहेत आणि त्याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचेही म्हटले आहे. एका चहाच्या कपात चमचाभर मिरीची चूर्ण, दोन चमचे मध आणि आल्याचे मिश्रण हे सलग पाच दिवस घेतले तर करोनाचा प्रभाव शंभर टक्के कमी होऊ शकतो.
एका संकेतस्थळाने या संशोधनाची खातरजमा करण्यासाठी तपासणी केली आणि असा कोणताही शोध लागला नसल्याचे उघडकीस आले. तसेच पुदुुच्चेरीच्या विद्यापीठाने स्पष्टीकरण देताना अशा प्रकारचे कोणतेही औषध आपल्या विद्यार्थ्याने तयार केलेले नसल्याचे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने तर अशा फेक बातम्यांसाठी वेगळे सेक्शनच तयार केले आहे. करोना संसर्गावर आतापर्यंत कोणतेही औषध तयार झालेले नाही आणि काळी मिरीच्या वापराने त्यापासून बचाव करता येत नाही, असे स्पष्ट केले. वास्तविक काळी मिरी ही आपल्या जेवणाला रुचकर करू शकते, परंतु करोना संसर्गापासून बचाव करू शकत नाही.
आणखी एक प्रसंग सांगता येईल. मध्य प्रदेशच्या गुना येथील काही नागरिकांनी नदीच्या कोरड्या पात्रात खड्डे खोदले आणि तेथून पाणी काढून ते करोनाचे औषध समजून प्राशन केले. गुनाच्या जोहरी गावातून बरनी नदी वाहते आणि ती उन्हाळ्यात दोन तीन महिन्यांसाठी कोरडी होते. कोरड्या पात्रात जर खड्डा खोदला तर त्यातून पाणी निघते. यादरम्यान गावात अफवा पसरली आणि ते पाणी चमत्कारी असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे करोना बरा होतो, असा समज पसरवला गेला.
अफवा पसरताच गावातील लोकांची पाणी पिण्यासाठी गर्दी उसळली. नदीपात्रात काही खड्ड्यात अगोदरच पाणी होते. तेच दूषित पाणी लोक प्राशन करू लागले. परिणामी अन्य आजाराचा फैलाव होण्याची भीती वाढली. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकायला तयार नव्हते.
काही कंपन्यांकडून नागरिकांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. काही तज्ज्ञ म्हणतात की, 90 टक्के रुग्ण हे घरातच साधारण औषधाच्या बळावर बरे होऊ शकतात. जर आपण ग्लुकोज पावडर दिली आणि मंत्रोच्चार केल्यास ते आपोआपच बरे होतात, असे ते म्हणतात. आपण त्याची पडताळणी केली तर प्रत्यक्षात हे रुग्ण बरे होत असल्याचा दावा औषधी कंपन्यांकडून केला जात असल्याचे निदर्शनास आले. ते लोकांचे शोषण करून औषध विक्री करण्यात यशस्वी होत आहेत. म्हणूनच खरे आव्हान हे दहा टक्के लोकांना योग्य उपचार मिळण्याचे आहे.– डॉ. जयदेवी पवार