आपण आपल्याला ओळखायला हवे, आपल्या क्षमता आणि मर्यादा यांची जाणीव आपल्याला असायला हवी. तसेच आपला आत्मविश्वास कोठंपर्यंत प्रभावीपणे उपयोगी पडू शकतो, हेही लक्षात घ्यायला हवे. पण जर अतिआत्मविश्वास बाळगला तर..? याचविषयी थोडेसे…
आपल्याला आयुष्यात आत्मविश्वासाची आवश्यकता असतेच. हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपल्याला अगदी शून्यातूनच सुरुवात करावी लागते. म्हणजे सुरुवातीला आपल्यामध्ये आत्मविश्वास नसतो तो अनेक अनुभवांतून, अनेक चांगल्या-वाईट घटनांतून, आपल्या कौशल्यातून, विचारांतून निर्माण होत जातो.
असा हा आत्मविश्वास आल्यानंतर आपण एखाद्या नवीन क्षेत्रातही आत्मविश्वासाने वावरू शकतो. असे जरी असले तरी आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांमध्ये फरक करणारी धूसर रेषा आपल्याला दिसायला हवी. ती जर दिसली नाही तर आपल्यात अतिआत्मविश्वास कधी निर्माण होतो हे लक्षात येत नाही. ते लक्षात येते अगदी शेवटच्या क्षणी नामोहरम झाल्यावरच!
आपण जरी नेहमीच समोरच्या व्यक्तीला मागे टाकत असलो, पराभूत करत असलो किंवा त्याच्यापेक्षा सरस कामगिरी करत असलो तरी तो काही गप्प बसलेला नसतो. तोही त्याच्यामध्ये सुधारणा करीतच असतो. आधीच्या पराभवातून शिकतच असतो. मग एक दिवस तो आपल्यापेक्षा सरस ठरतो. रावणाने रामाच्या बाबतीत चूक केली. रावणाला वाटले की राम आपले काहीच बिघडवू शकणार नाही. पण येथेच रावणाने अतिआत्मविश्वासाचा टप्पा गाठला आणि पराभूत झाला. हाच रावण की ज्याने अनेक देवतांना पराभूत केले होते. नव ग्रहांना वश केले होते. पण रामाला समजण्यात चूक केली. आपणही दुसऱ्याला कमी समजण्याची चूक करायची नाही.
येथे केवळ स्पर्धात्मक जीवनातील आत्मविश्वास असे अपेक्षित नाही तर इतरही बाबतीत लागू पडतो. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्यात होणारे बदल लक्षात घेऊन त्याचा परिणाम आगामी काळात काय होऊ शकतो हे जर उमजलेच नाही किंवा तो बदल आपल्यावर काहीच परिणाम करू शकणार नाही, असे वाटत असेल तर तो आपला फाजिल आत्मविश्वास असू शकतो. म्हणूनच आपण आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यात असणारी धूसर रेष ओळखायला हवी. आपण त्या रेषेपर्यंत पोहोचायचे पण म्हणजेच संपूर्ण आत्मविश्वास मिळवायचा पण ती रेष ओलांडून पुढे जर गेलो तर आपण खाली पडणार आहोत हे पक्के लक्षात ठेवावे.
एकेकाळी चित्रपट, चित्रपट गृहात जाऊन पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण आज आपण कोणत्याही क्षणाला आपल्या आवडीचा चित्रपट पाहू शकतो तेही चित्रपट गृहात न जाता. हे जे बदल चित्रपट क्षेत्रात होत गेले तसेच आपल्याही कार्यक्षेत्रात असेच बदल घडत असतात आणि सध्याच्या काळात सुमारे दर तीन वर्षांनी आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. एकेकाळी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी संक्षिप्त संदेशाचा (एस.एम.एस.) एवढा प्रभावी वापर केला जात असे की, त्यासाठी सेवा पुरवणाऱ्या आस्थापनांना विशेष तरतूद करून ठेवावी लागत असे. पण आज आपल्याला नव वर्षाच्या शुभेच्छा देणारे किती संक्षिप्त संदेश प्राप्त होतात? तंत्रज्ञान झपाट्याने बदलत गेले आणि आपण ते स्वीकारतही गेलो. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर होणाऱ्या बदलांचा परिणाम माझ्यावर काय होणार? असा फाजिल आत्मविश्वास बाळगण्यात काहीच अर्थ नाही.
आपण अतिआत्मविश्वासाच्या टप्प्यात तर पोहोचलो नाही ना? याची खात्री करून घेण्यासाठी आपणच स्वतःच स्वतःची परीक्षा घ्यायला हवी. आपणच आपल्याशी तुलना करून पाहायला हवी. आपली मागची कामगिरी कशी होती आणि आजची कशी आहे हे सतत पडताळून पाहत राहावे. यामुळे आपली पकड ढिली होत चालली आहे का, हे लक्षात येते. आपल्याकडील तलवारी कधी म्यानातून बाहेर काढल्याच नाही तर गंजून जातील, आणि गंजून गेल्या आहेत ते आपल्याला शेवटच्या क्षणी समजेल. म्हणूनच आपल्या आत्मविश्वासरूपी तलवारीला नियमितपणे म्यानातून बाहेर काढायला हवी आणि धारही लावायला हवी.
वय जसे दिवस सरला की वाढत जाते, तसा अनुभव दिवस सरला वाढत नाही. तर त्या दिवसातून आपण नवीन काय आत्मसात केले, नवीन काय ग्रहण केले यातूनच वाढत जातो. बरेच जण येथेच गफलत करतात. मजला अमुक एक एवढ्या वर्षांचा अनुभव आहे असे अभिमानाने सांगत असतात. पण हे काही खरे नाही. आपण आपला अनुभव कालखंडावर नाही तर “कामगिरी’ याच एका निकषावर मोजायला हवा. आपण सर्वांनी दहावीची परीक्षा दिलेलीच असते.
परीक्षेचा अभ्यास आपण किती वर्षे, किती दिवस केला हे कोणीच विचारात घेत नाही. अभ्यासाचा किती दिवसांचा अनुभव आहे असे कोठेच विचारले जात नाही. तर परीक्षेत किती गुण मिळाले हेच विचारात घेतले जाते. एखादा कमी गुण मिळालेला विद्यार्थी जास्त दिवस अभ्यास करीत असेल, तर दुसरा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्याने त्या कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यापेक्षा कमी तास अभ्यास केला असेल. शेवटी परीक्षेतील गुण महत्त्वाचे. व्यवसायातही असेच आहे. व्यवसाय वृद्धी होणे महत्त्वाचे मग त्यासाठी किती प्रयत्न केले एक, दोन, तीन… याची गणना करण्यात काहीच अर्थ नाही. आपणही आपल्या कामगिरीवर लक्ष ठेवायचे. इतर कोणत्याही निकषाचा आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी काहीच महत्त्व नाही.
आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून निवांतपणे सिंहावलोकन करायला काय हरकत आहे? आपण जास्त वहावत तर चाललो नाही ना? याचा विचार करायला काय हरकत आहे? जर आपण आपल्या मनःचक्षूंनी आत्मविश्वासाकडे पाहिले तर अतिआत्मविश्वाच्या अलीकडे असणारी धूसर रेषा सहज स्पष्टपणे दिसू शकते.
– अनिकेत भालेराव