भारतीय संस्कृतीमध्ये रात्रीच्या वेळी झाडाचे पान, फुल तोडण्यास विरोध केला आहे. असे असताना गजबजलेल्या परिसरात आणि रहदारीच्या भागात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चक्क झाडांची अमानुष पद्धतीने कत्तल केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणी गरजेचे आहे.
बुधवारी सकाळपर्यंत झाडे डौलाने उभा होती. पर्यावरणाचे रक्षण करत होते. परंतु कोणीतरी जाणूनबुजून झाडांवर कुऱ्हाड चालवून पर्यावरणाची हानी केली आहे. उद्यानविभागाचे कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळाताच ते घटनास्थळी आले असून पाहणी केली आहे. याबाबत स्थानिक पोलीस चौकीला कळविणार असल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या योजनेला हारताळ
महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून “झाडे लावा झाडे जगवा’ ही योजना राबवित आहे. झाडांच्या संवर्धनाकरिता करोडो रुपये खर्च करीत आहे. शीव रस्त्याच्या दुतर्फा महापालिकेच्या वतीने झाडे लावण्यात आली. या झाडांचे संगोपन देखील करण्यात आले. जनावरांपासून तसेच माणसांपासून या झाडांचे संरक्षण व्हावे म्हणून संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आलेल्या आहेत. असे असताना पर्यावरणास हानी पोहचविणाऱ्या व्यक्तीने या झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे. त्यामुळे एक प्रकारे महापालिकेच्या योजनेलाच हारताळ फासण्याचे काम येथे
घडले आहे.
व्यावसायिकांकडे शंकेची सुई
शीव रस्त्याच्या कडेला व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहे. या झाडांमुळे व्यावसायिकांची दुकाने व फलक ग्राहकांना सहजपणे दिसत नव्हते. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनीच हे कृत्य केले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अनेक दुकानांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत विचारपूस केल्यावर आमचे सीसीटीव्ही बंद आहेत असे दुकानदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे संशय बळावला जात आहे असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
अशा प्रवृत्तींना चांगलेच ठेचले पाहिजे. दोषींवर योग्य ती कारवाई करा.
– वैष्णवी पाटील, वृक्षप्रेमी, अध्यक्षा आरंभ फाउंडेशन.
सकाळी फिरायला जाताना रस्त्याच्या कडेची झाडे कोणीतरी कुऱ्हाडीने तोडल्याचे दिसून आले. मनाला वाईट वाटले. सर्वजण झाडे जगविण्यासाठी धडपडत असताना असे झाडांच्या मुळावर कोण उठू शकते? दोषींवर कारवाई केली जावी.
– किरण जांभुळकर, सामाजिक कार्यकर्ते.