येरवडा (प्रतिनिधी) – रिक्षामध्ये बसून दारू पिणाऱ्याना रिक्षात बसून घाण करू नका असे हटकल्यावरून येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे सहा दुचाकी पेटवून दिल्या. गाड्या उभ्या करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. याप्रकरणी सोमनाथ सोपान गायकवाड यांनी फिर्याद दिली असून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील संतोष मित्र मंडळ जवळ दुचाकी पेटवण्याची घटना घडली. घराबाहेर दुचाकी उभी करण्याच्या वादातून स्थानिक सराईत आरोपींनी हा प्रकार केल्याचे समजते. अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेत 6 दुचाकी जाळण्यात आल्या असून. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा) किशोर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे)लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करीत आहेत.