नवी दिल्ली – प्रदेश भाजप अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर केलेल्या टीकेची खिल्ली उडवताना, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी झारखंडमध्ये दाखल होत असल्याने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. हेमंत सोरेन यांना त्यांच्या कर्मामुळेच अटक झाल्याची टीका बाबुलाल मरांडी यांनी केली होती.
ठाकूर म्हणाले की, बाबुलाल मरांडी यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. भाजपमध्ये जाण्यापेक्षा कुतुबमिनारवरून उडी मारणे चांगले आहे, असे बाबुलाल मरांडी म्हणायचे. राहुल गांधी झारखंडमध्ये दाखल होत असल्याने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी मी आरोग्यमंत्र्यांना भेटेन असे ठाकूर म्हणाले.
एएनआयशी बोलताना मरांडी म्हणाले होते की, हेमंत सोरेन यांना त्यांच्या कर्मामुळे अटक करण्यात आली आहे. जसे पेरले, तसे कापावे अशी एक म्हण आहे. गेल्या चार वर्षांपासून ते राज्याची लूट करत होते. त्यांचे सरकार भ्रष्ट अधिकारी आणि मध्यस्थ चालवतात.
विविध प्रकल्पांमधील त्रुटींबद्दल मी सरकारला पत्र लिहितही होतो. मात्र, त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. हळूहळू त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि तुरुंगात जावे लागले, असेही ते पुढे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा ठाकूर यांनी आज चांगलाच समचार घेतला.