पिंपरी – महापालिकेच्या निवडणुका जवळ येताच सर्वच राजकीय पक्षांनी शहरात सुरू केलेली आरोप-प्रत्यारोपाची धुळवड अचानकच शांत झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेल्या राजकीय नाट्यामुळे शहर पातळीवरील चारही मुख्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकदमच शांत झाले आहेत. पुढील समीकरणे कशी असतील याबाबत संभ्रम असल्याने कुणीच कुणावर आरोप करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. या बंडाळीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नीरव शांतता पसरली आहे. त्यामुळे इतना सनाटा क्यू है भाई, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्येच उभी फूट पडली असून आता पुढे काय? या प्रश्नाने सर्वच राजकीय पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शहरातील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करताना महाविकास आघाडी म्हणून शहरातील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्र आंदोलन करत होते. केंद्र सरकारच्या विरोधात वेळोवेळी आक्रमक होऊन भाजपला सडेतोड उत्तर देत होते. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविण्याच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेत महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत होता.
महागाईसह विविध मुद्यांवर आंदोलन करताना महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपवर सोशल मीडियावरही तुटून पडत होते. स्थानिक पातळीवर प्रत्येक लहान-मोठ्या बाबींवरुन मविआ विरुद्ध भाजप असे चित्र दिसून येत होते. प्रसिद्ध पत्रकांचे तर रोज युद्ध सुरू होते. परंतु अचानकच सर्व काही शांत झाले आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियावरील पोस्ट देखील जपून केल्या जात आहेत. पुढे कोणता पक्ष आणि कोणता नेता कुणासोबत जाईल, याचा अंदाज नसल्याने सावध पवित्रा घेत अनेकांनी मौन बाळगले आहे.
भाजपमध्ये उत्साह; पण सावध पवित्रा
महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता राजकीय वतुर्ळात वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेते सक्रीय झाले आहेत. राज्यात पुन्हा भाजप आणि शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी भाजपचे कार्यकर्ते देखील सोशल मीडियावर व्यक्त होताना सावध पवित्रा बाळगून आहेत.