नवी दिल्ली – मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढ या राज्यांमधील मुख्यमंत्री निवडीविषयीचा सस्पेन्स रविवारी संपण्याची चिन्हे आहेत. तिन्ही राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने बाजी मारली.
मात्र, त्या पक्षाचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री निवडीबाबत सावध पाऊले टाकताना दिसत आहे. निकालानंतर पाचव्या दिवशी पक्षाने तिन्ही राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली.
आता त्यांच्या उपस्थितीत तिन्ही राज्यांत पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका होतील. त्या बैठकांमध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड होईल. ते नेतेच संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री असतील.
बैठकांची प्रक्रिया रविवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दिवशी तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ते स्पष्ट होईल, असे भाजपच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.