ईश्वर उपासनेतील एक महत्त्वाची कृती म्हणजे आरती. आरती म्हणजे भाविक भक्तांनी आपल्या उपास्य देवतेची केलेली काव्यमय विनवणी. आरतीच्या रचनांच्या गायनाला एक विशिष्ट अशी लय असते, ताल असतो. प्रत्येक आरतीची चाल, ठेका हा सुद्धा ठरलेला असतो. आरत्या त्याच पद्धतीने म्हटल्या गेल्या तरच त्या श्रवणीय ठरतात. आरती करताना त्यातील आर्त आणि शरणागत भावास प्राधान्य देणे फार आवश्यक असते.
आरतीची रचना ही भावपूर्ण असते. भाविकांनी त्याचा विचार करणे गरजेचे असते. आरतीमध्ये त्या देवतेचे गुणवर्णन केलेले असते. देवतेस भक्तांच्या कल्याणाची विनवणी केलेली असते. उदा. श्री गणेशाच्या आरतीत केलेले “सुखकर्ता, दु:खहर्ता’ हे गुणवर्णन किंवा देवीच्या आरतीत “दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी।। वारी वारी जन्म मरणा ते वारी । हारी पडलो आता संकट निवारी।’ ही देवीची केलेली विनवणी.
आरतीच्या शेवटी रचनाकार आपल्या नावाचा उल्लेख करून त्या देवतेकडे कृपादानाची मागणी करीत असतो. आरती करताना आपण ती केव्हा आणि कशाने करतो यावरून त्या आरत्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. उदा., पहाटेच्या वेळी काकडा पेटवून केलेली काकड आरती, धूप लावून केलेली धूपारती, रात्री देव शयनी जाण्यापूर्वी केली जाणारी शेजारती इत्यादी. आरती करण्यासाठी तबक तयार करताना त्यात तुपाचे निरांजन, कापूर, अक्षता, फुले इत्यादी साहित्य तयार ठेवावे लागते.
आरती ओवाळीत असताना ती कशाप्रकारे ओवाळायची याचेही एक स्वतंत्र शास्त्र आहे. आरती करणाऱ्याने हातातले आरतीचे तबक हे डावीकडून उजवीकडे गोलाकार ओवाळायचे असते. डावीकडून आरती वर नेताना ती समोरच्या देवतेच्या समोर आणायची आणि काही क्षणासाठी तिथे स्थिर करायची. मग पुन्हा उजव्या बाजूने खाली घ्यायची, ही आरती करण्याची खरी पद्धत आहे. त्या समोरच्या देवतेचे तेज त्या तबकातील दीप ज्योतीच्या माध्यमातून आपल्यात स्वीकारणे हा आरती करण्याच्या कृती मागचा खरा गुढार्थ आहे.
आपल्या मराठी साहित्यात अनेक सुंदर आरत्यांचा एक मोलाचा खजिना आहे. आरती ह्या भक्ती प्रकाराला लोकमानसात एक आगळेवेगळे मानाचे स्थान आहे. आरती ही आपल्या संस्कृतीची एक चिरंतन खूण आहे.
– अरुण गोखले