- अपघाताचा धोका वाढला : अनेक ठिकाणी यंत्रणेत बिघाड
पिंपरी – शहराच्या विविध भागांमधील अनेकठिकाणची वाहतूक सिग्नल यंत्रणा बंद आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तर अशा ठिकाणी प्राणांतिक अपघात झाल्याशिवाय महापालिका प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का ? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.
शहरातून पुणे-मुंबई, पुणे-नाशिक, पुणे-बंगळुरु द्रुुतगती मार्ग, पालखी महामार्ग, द्रुतगती, जुना पुणे-मुंबई महामार्ग व नाशिक महामार्गाला जोडणारा स्पाइन रस्ता असे अनेक महत्वाचे रस्ते जातात. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त आहेत. उद्योगनगरी असल्याने या रस्त्यांवर अवजड वाहनांची कायम वर्दळ सुरु असते. अशातच सकाळी, रात्री-अपरात्री विविध पाळ्यांमधून सुटलेल्या कामगारांचीदेखील घरी व कामावर पोहोचण्यासाठी सतत ये-जा सुरु असते. तर या मार्गांवरील अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. नेमके कोणी थांबवून अन्य वाहनाला पुढे जाऊ द्यावे, यावरुन वाहनचालकांमध्ये वाद होत आहेत.
स्पाइन रस्त्यावरील जाधव सरकार चौक आणि शिवाजी महाराज चौक या दोन्ही ठिकाणची सिग्नल यंत्रणा बंद आहे. तर आळंदी-पुणे रस्त्यावरील मॅगझिन या महत्वाच्या चौकात सिग्नल यंत्रणा उभारून दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
मात्र, याठिकाणचा चालू बंद होणारा अंबर दिवा वाहनचालकांना स्वत:ची काळजी घेण्याचा संदेश देत आहे. याठिकाणी दिघी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रणाऐवजी रस्त्याच्या एका बाजूला थांबून सावज शोधत असतात.
सर्वाधिक वर्दळीचा चौक मानल्या जाणाऱ्या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौकातील सिग्नल यंत्रणेच्या टायमिंगमध्ये बिघाड झाला आहे. पिंपरीतील उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिग्नल ग्रीन होण्याच्या बराच वेळ आधी टायमिंग शून्य होत असल्याने वाहनचालक गाड्या पुढे घेतात आणि तेवढ्या वेळात नाशिक फाट्याकडून येऊन चिंचवडकडे जाणाऱ्या रस्त्याचा सिग्नल ग्रीन झालेला असतो. यामुळे या ठिकाणी कायमच अपघाताची भीती असते.
नाशिक महामार्गावरील मोशी चौक धोकादायक
पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मोशी उपबाजार समितीकडे जाणारा चौक धोकादायक आहे. मोशीकडून भोसरीकडे जाणारी वाहने बाजार समितीकडे वळण्यासाठी या चौकातुन जातात. मात्र या चौकात सिग्नल यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने महामार्गावरुन प्रवास करनाऱ्या चालकांना सदसदविवेक बुद्धीनेच प्रवास करावा लागत आहे. याठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.