प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा, याचा ज्ञानकोश म्हणजे संतसाहित्याचे अभ्यासक प. पू. श्रीसद्गुरू डॉ. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे महाराजांचे ईश्वरेच्छा हे चरित्र होय. नामाचे, ध्यानाचे, निस्सीम भक्तीचे, चिंतनाचे, भक्तीतील दृढतेचे, विकार आणि विकल्परहित विचारांचे, श्रीसद्गुरूंवरील विश्वासाचे, प्रेमळ नात्याचे, जीवनाच्या सत्य शोधनाचे, परमात्म्याच्या कृपेचे आणि ईश्वरी इच्छेचे महत्त्व अनुभवण्यासाठी श्रीमहाराज आयुष्यभर जीवनातील प्रवासात प्रयास करत आनंदी राहिले.
अध्यात्मिकतेच्या मार्गावर प्रथम केवळ ग्रहस्थ असलेल्या साधकास मार्गस्थ होण्यासाठी सकारात्मक वैचारिक मंथनाच्या माध्यमातून “ईश्वरेच्छा’ या ग्रंथाच्या अध्ययनाद्वारे यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचे दर्शन घडू शकते. प्रत्येक साधकाने साधना ही नेहमीच त्यांचे कर्तव्य समजून नित्यनेमाने, अंतर्मुख होऊन, आत्मभान जागरूक ठेवून, आत्मिक आनंदासाठी केली पाहिजे असे त्यांनी या ग्रंथात नमूद केले आहे. त्यासाठी सर्वप्रथम आत्मनिष्ठ होणे जरुरीचे असते.
आपल्या आत्मनिष्ठतेमुळे आपल्यात नवचैतन्य, नवी उमेद, नवा उत्साह आणि नवा जोश निर्माण होत असतो. आत्मविश्वास वाढीस लागण्याची सुरुवात ह्याच प्रकारे होत राहते. आत्मविश्वास आणि श्रीसद्गुरूंवरील विश्वासच केवळ आपला श्वास सुरू ठेवून आपणास आत्मनाभूती आणि आनंदानुभूती देत राहू शकतात. ही निरंतर प्रक्रिया असल्याचे विसरून चालणार नाही, हेही ईश्वरेच्छा या ग्रंथात त्यांनी निक्षून सांगितले आहे.
देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात, विचारात, उच्चारात तसेच विचारांत, वर्तनात आणि व्यवहारांत चुकून देखील मी पणा अथवा माझेपणा दिसत नाही. हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक आणि संत असल्याचे मूळ लक्षण होय. अर्थात, स्वत:बद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जीवनाचे, मनुष्य जन्म जगण्याच्या संधीचे सोने व्हावे, कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे प्रेमाचा पाझर फुटणाऱ्या श्रीमहाराजांचे चरित्र होय. प्रापंचिकाच्या, साधकांच्या प्रत्येक अध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते.
परमार्थ हा चर्चेचा विषय नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभूतीचाच विषय आहे, याची खुणगाठ जर मनाशी पक्की बांधली तर त्यातून साधकास प्राप्त होणारी शक्ती नुसती त्याला जागवत नाही, तर त्याचे जीवन सफल करण्यास मदत करत राहते, हे ह्या ग्रंथाच्या अध्ययनाने वाचकांना, साधकांना नीटपणे समजू शकते.
अध्यात्म्याचा अंत:करणातून पुरस्कार होऊ लागल्यावर प्रेमभावाची होणारी जागृती आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या माणसातही बदल घडवून आणते; इतकेच नव्हे, तर विशेष प्रेमभाव प्राणिमात्रांच्या सहवासात जर प्रकट होत राहिला, तर त्यांच्यातही बदल झाल्याचे जाणवते. अध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी ईश्वरेच्छा हा ग्रंथ प्रत्येकाने एकदा तरी अध्ययनाच्या दृष्टीने वाचावा आणि शक्य झाल्यास आपल्या ग्रंथसंपदेत समाविष्ट करावा.