कानपूर – भारतीय संघाने आपला दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला. त्यात पहिल्या डावातील शतकवीर श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांनी अफलातून अर्धशतके फटकावली.
भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर पहिल्या कसोटीत विजयासाठी 284 धावा करण्याचे आव्हान ठेवले व चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांची अवस्था 1 बाद 4 अशी केली असून या सामन्यातील विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची भारतीय संघाला संधी मिळाली आहे.
भारतीय संघात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पदार्पण केलेल्या श्रेयस अय्यरच्या नावावर अनोखी कामगिरी नोंदली गेली आहे. त्याने या दोन्ही डावात भारतीय संघाचा डाव सावरताना अफलातून खेळी केल्या. पहिल्या डावात दमदार 105 धावांची शतकी खेळी करणाऱ्या श्रेयसने दुसऱ्या डावात 125 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 65 धावांची खेळी केली. पदार्पणातील कसोटीत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करण्याची कामगिरी करत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून एक विक्रम साकार केला. अशी कामगिरी करणारा श्रेयस भारताचा पहिलाच फलंदाज ठरला.
यापूर्वी दिलावर हुसेन यांनी 1933-34 साली इंग्लंडविरुद्ध 59 आणि 57 अशी खेळी केली होती. त्यानंतर विक्रमादीत्य सुनिल गावसकर यांनी 1970-71 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 65 आणि 67 धावा केल्या.
पहिल्याच कसोटीत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या सामन्यात 170 धावा केल्या. यापूर्वी रोहित शर्माने पदार्पणात 177 व शिखर धवने 187 धावा केल्या होत्या.