कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उद्रेक : बैठकीत केला ठराव
पुणे -“विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची वाट धरत पक्षाच्या काही गद्दारांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठी ताकद लावली. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे सरकार येताच, वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात असून त्यांना पुन्हा पक्षात स्थान देऊ नये,’ अशा शब्दांत शहर कॉंग्रेसच्या सदस्यांनी रविवारी कॉंग्रेसच्या बैठकीत आपल्या मनातील खदखद व्यक्त करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांना फक्त या गद्दारांमुळेच पराभव पत्कारावा लागला असून त्यांचा अहवाल केंद्रीय नेतृत्त्वाला पाठवणार, असा ठराव बैठकीत करण्यात आला. यावेळी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शहर कॉंग्रेसने ही बैठक बोलवली होती. त्यास विधानसभेचे तिन्ही उमेदवार तसेच शहर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाविकास आघाडीच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर होताच, कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या विषयाला हात घातला. निवडणुकीच्या तोंडावर शहरातील अनेक कॉंग्रेसचे नेते, आजी माजी पदाधिकारी कॉंग्रेस पक्ष सोडून गेले व त्यांना कॉंग्रेस पक्षाने सर्वकाही पदे देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्याबद्दल बैठकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तसेच आता सत्ता आल्यामुळे पक्ष सोडून गेलेले काही पदाधिकारी पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश मिळावा, यासाठी काही नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत असून अशा पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात अजिबात स्थान देण्यात येऊ नये, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
“विरोधी पक्षाची मोठी फौज मतदारसंघात असताना देखील स्वतः आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे चांगली लढत देऊ शकलो. परंतु पक्ष सोडून गेलेले मतदारसंघातील काही स्वार्थी पदाधिकारी व त्यांना आपल्याच पक्षातून मिळालेले प्रोत्साहन यामुळे थोडक्यात विजय हुकला. कोणी काय कारस्थाने केली, याबाबतचा अहवाल मी तयार करणार असून लवकरच गद्दारांच्या नावासह तो जाहीर करणार,’ असे यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दत्ता बहिरट म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केले. अशी गद्दारी केलेल्यांची शिफारस प्रदेश कॉंग्रेसच्या सदस्यत्वासाठी देखील काही स्वकियांनीच केली. अशा नेत्यांमुळेच पक्षाची हानी होत असून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
– रमेश बागवे, शहाराध्यक्ष, कॉंग्रेस