जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयने आता झिम्बाब्वेला पाणीही पाठवायचे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे खेळाडूंनी आंघोळीसाठीही कमी पाणी वापरावे असे सांगितले गेले आहे.
झिम्बाब्वे क्रिकेट मंडळ तसेच बीसीसीआयनेही खेळाडूंना पीाण जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मग आता या खेळाडूंना पाणी टंचाईच्या झळा बसणार का, तसेच आता पुढील काळात ज्या देशात मालिका होणार आहेत तेथे अन्य सुविधांपेक्षा पाणी आहे का, असे विचारूनच संघ पाठवावा लागणार का व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आजवर कधीही घडले नाही ते पारोश्याने सामने खेळण्याची परंपरा या मालिकेद्वारे सुरू होणार का, असे काही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.
क्रिकेटच्या मालिकेसाठी पाणी पुरवण्यापेक्षा त्यांच्या नागरिकांसाठी ते उपलब्ध व्हावे हे त्यांच्या मंडळानेही पाहिले पाहिजे. खेळाडूंसाठी, क्रिकेटसाठी जनतेला डावलले जाऊ नये. अर्थात हे काही परदेशातील मालिकांमध्ये पहिल्यांदाच घडत आहे असे नाही.
यापूर्वी भारतीय संघ 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असतानाही अशाच पाणी टंचाईचा सामना खेळाडूंना करावा लागला होता. तसेच त्यापूर्वी 2016 सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये होता तिथे पिण्यासाठीही पाणी मिळवणे कठीण बनले होते. यावर विनोद करण्याचा प्रपंच नाही. मात्र, ज्या देशात भारतीयच नव्हे तर जे संघ दौरा करणार आहेत तेथे काय परिस्थिती आहे हे कधीतरी लक्षात घेतले जाणार आहे का, मुळातच ही मालिका बीसीसीआयने का आयोजित केली हाच मोठा प्रश्न आहे.
यापुढील काळात आपला संघ केवळ टी-20 सामने खेळणार आहे, तसेच ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही खेळणार आहे. मग मध्येच ही तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका का घुसवण्यात आली. ही नफेखोरी थांबवली गेली तर खेळाडूंना काही मालिकांमधून विश्रांती घ्यावी लागणार नाही तर ती आपोआपच मिळेल, पण जर खरेच झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाला चार पैसे मिळावेत या उद्देशाने ही मालिका होत असेल तर ती भारतातच का घेतली गेली नाही.
हल्ली प्रत्येक देश भारतीय संघाशीच मालिका खेळण्यासाठी आग्रही असतो कारण भारतीय संघ खेळला तरच पैसा मिळतो, पण या अशा मालिका आयोजित करताना तेथे कोणत्याही गोष्टींचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जावी अशी अपेक्षा आहे. नाही तर पैसाही बीसीसीआय देत आहे तर मग खेळाडूंच्या येण्याजाण्यापासून पाण्यापर्यंत सर्व गोष्टी बीसीसीआयनेच कराव्यात.