लखीमपूर खेरी – भारतीय किसान युनियनच्या आणखी एका शेतकरी नेत्यावर हल्ला करण्याचा प्रकार उत्तरप्रदेशात घडला आहे. ज्यांच्यावर आज हा हल्ला झाला, त्या नेत्याचे नाव दिलबाग सिंग असे असून ते लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार आहेत. ते भारतीय किसान युनियनचे जिल्हा अध्यक्ष आहेत.
ते मंगळवारी रात्री गोला कोतवाली भागातील अलीगंज-मुडा रस्त्यावरून आपल्या एसयूव्हीमधून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तथापि सिंग यांना मात्र या हल्ल्यात कोणतीही दुखापत झालेली नाही. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत.
3 ऑक्टोबर 2021 रोजी लखीमपुरला चार शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात ते महत्वाचे साक्षीदार आहेत. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. पीटीआयशी फोनवर बोलताना दिलबागसिंग यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी त्याच्या एसयूव्हीचा टायरही गोळीबार करून पंक्चर केला. त्यामुळे आम्हाला हे वाहन तेथेच सोडून जावे लागले. हल्लेखोरांनी एसयूव्हीचे दरवाजे आणि खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाल्यावर त्यांनी ड्रायव्हरच्या बाजूच्या खिडकीच्या चौकटीवर दोन गोळ्या झाडल्या, असे ते म्हणाले.
या गाडीत आपण एकटेच होतो व आपण स्वत: ही गाडी चालवत होतो असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.